Cricket World Cup 2019 : भारतीय संघाने आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सहज विजय मिळवत विजयी सलामी दिली. या सामन्यात रोहित शर्माने दमदार शतक ठोकले आणि नाबाद खेळी करत भारताला विश्वचषक स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिला. हा विजय मिळाल्यानंतर सर्व स्तरातून भारतीय संघाचे आणि रोहितचे दणकून कौतुक करण्यात आले, पण पाकिस्तानच्या पहिल्या विजयनानंतर त्यांच्या अभिनंदनाचे ट्विट करणाऱ्या टेनिसपटू सानिया मिर्झाला मात्र या विजयाचा विसर पडल्याचे दिसून आले.

सलामीच्या सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरे गेल्यानंतर पाकिस्तानच्या संघाने स्पर्धेत दमदार पुनरागमन केले. पाकिस्तानने यजमान इंग्लंडला १४ धावांनी पराभूत केले आणि स्पर्धेतील गुणांचे खाते उघडले. याबाबत सानियाने ट्विट करून पाकिस्तानच्या संघाचे अभिनंदन केले. “पाकिस्तानच्या संघाने दमदार पुनरागमन करत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला. कोणालाही अंदाज नसताना तुम्ही ज्या पद्धतीचा विजय मिळवलात, त्यासाठी तुमचे अभिनंदन !!! आता क्रिकेट विश्वचषक अधिक रंजक झाला आहे”, असे ट्विट सानियाने केले होते.

भारताने बुधवारी सहजपणे सामना जिंकल्यानंतर सानियाने भारतीय संघाचेही अभिनंदन करावे, असे क्रिकेटरसिकांना वाटत होते. पण सानियाने भारताला विजयाच्या शुभेच्छा देणारे ट्विट केले नाही. त्यामुळे नेटिझन्सने तिला चांगलेच सुनावले.

दरम्यान, आफ्रिकेने दिलेल्या माफक २२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर शिखर धवन स्वस्तात माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ४१ धावांची छोटेखानी भागीदारी झाली. विराट कोहली फेलुक्वायोच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर लोकेश राहुल आणि रोहितने पुन्हा एकदा भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. लोकेश राहुल रबाडाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर रोहित शर्माने महेंद्रसिंह धोनीच्या साथीने आपलं शतक साजरं करत भारताला विजयाच्या जवळ आणून ठेवलं. विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना धोनी झेलबाद झाला. यानंतर रोहित शर्माने हार्दिक पांड्याच्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

त्याआधी युजवेंद्र चहल आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पहिला विश्वचषक सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला २२७ धावांवर रोखलं. सलामीच्या फळीतील फलंदाजांचं अपयश हे आफ्रिकन संघाच्या खराब कामगिरीचं कारण ठरलं. आफ्रिकेकडून मधल्या फळीत ख्रिस मॉरिसने आश्वासक फलंदाजी केली. नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसला. जसप्रीत बुमराहने हाशिम आमला आणि क्विंटन डी-कॉक यांना माघारी धाडत आफ्रिकेला बॅकफूटला ढकललं. यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि वॅन डर डसन यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. मात्र चहलने डसन आणि डु प्लेसिस यांना ठराविक अंतराने माघारी धाडत भारताचं पारडं पुन्हा एकदा जड केलं. मधल्या फळीत भरवशाच्या जे.पी.ड्युमिनीलाही फारशी चमक दाखवता आली नाही. तो कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. यानंतर फेलुक्वायो आणि ख्रिस मॉरिस यांनी सातव्या विकेटसाठी छोटेखानी भागीदारी करत संघाला २०० धावांचा टप्पा गाठून दिला. भारताकडून युजवेंद्र चहलने ४ बळी घेतले. त्याला जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी २-२ तर कुलदीप यादवने १ बळी घेत चांगली साथ दिली.

नाबाद शतकी खेळीसाठी रोहित शर्माला सामनावीर किताब देऊन गौरवण्यात आले.