विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माचे शतक आणि लोकेश राहुल, कर्णधार विराट कोहलीच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने त्रिशतकी मजल मारली. ५ गड्यांच्या मोबदल्यात भारतीय संघाने ३३६ धावा केल्या आणि सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानच्या संघाला ३३७ धावांचे आव्हान दिले.

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानच्या गोलंदाजांना धुवून काढले. वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू अशा दोनही गोलंदाजांचा समाचार घेत भारतीय फलंदाजांनी एक नवा इतिहास रचला. ३३६ धावांची मजल ही भारताची पाकिस्तानविरुद्धची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या ठरली. या आधी २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत भारताने ३०० धावा ठोकल्या होत्या. ती आतापर्यंत सर्वाधिक धावसंख्या होती. मात्र भारतीय संघाने दमदार फलंदाजी करत हा इतिहास रचला.

भारतीय फलंदाजांच्या आक्रमक खेळापुढे पाकिस्तानचे गोलंदाज पुरते हतबल झाले. नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय पुरता फसला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची शतकी भागीदारी केली. यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपली अर्धशतकं पूर्ण केली. वहाब रियाझने लोकेश राहुलचा अडसर दूर करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर रोहित शर्माने कर्णधार विराट कोहलीच्या सोबतीने संघाचा डाव सावरला.

दोन्ही खेळाडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारीही झाली. अखेरीस रोहित शर्मा हसन अलीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने १४० धावांची खेळी केली. यानंतर हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत विराट भारताच्या धावसंख्यात भर घातली. पांड्या माघारी परतल्यानंतर धोनीही अवघी एक धाव काढून माघारी परतला. अखेरीस धोनीने विजय शंकरच्या साथीने संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. विराट कोहलीही ७७ धावांवर मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पाऊसाचा व्यत्यय थांबल्यानंतर आमिरने त्याची विकेट घेतली.

यानंतर केदार जाधव आणि विजय शंकर जोडीने फटकेबाजी करत संघाला ३३६ धावांचा टप्पा गाठून दिला. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने ३ तर हसन अली आणि वहाब रियाझ यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.