विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माचे शतक आणि लोकेश राहुल, कर्णधार विराट कोहलीच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने त्रिशतकी मजल मारली. ५ गड्यांच्या मोबदल्यात भारतीय संघाने ३३६ धावा केल्या आणि सामना जिंकण्यासाठी पाकिस्तानच्या संघाला ३३७ धावांचे आव्हान दिले.

भारतीय फलंदाजांच्या आक्रमक खेळापुढे पाकिस्तानचे गोलंदाज पुरते हतबल झाले. या बरोबरच भारतीय संघासाठी एक अनोखा आणि सुखद असा योगायोग जुळून आला. भारताकडून उपकर्णधार रोहित शर्मा याने १४० धावांची दमदार खेळी केली. या खेळीत त्याने १४ चौकार आणि ३ षटकार लगावले. २०१५ च्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहली याने शतक झळकावले होते. महत्वाचे म्हणजे त्यावेळी विराट कोहलीदेखील संघाचा उपकर्णधार होता. विराटने त्या सामन्यात १२६ चेंडूत १०७ धावा केल्या होत्या.

दरम्यान, नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय पुरता फसला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची शतकी भागीदारी केली. यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपली अर्धशतकं पूर्ण केली. वहाब रियाझने लोकेश राहुलचा अडसर दूर करत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर रोहित शर्माने कर्णधार विराट कोहलीच्या सोबतीने संघाचा डाव सावरला.

दोन्ही खेळाडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारीही झाली. अखेरीस रोहित शर्मा हसन अलीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने १४० धावांची खेळी केली. यानंतर हार्दिक पांड्याने फटकेबाजी करत विराट भारताच्या धावसंख्यात भर घातली. पांड्या माघारी परतल्यानंतर धोनीही अवघी एक धाव काढून माघारी परतला. अखेरीस धोनीने विजय शंकरच्या साथीने संघाला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. विराट कोहलीही ७७ धावांवर मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पाऊसाचा व्यत्यय थांबल्यानंतर आमिरने त्याची विकेट घेतली.

यानंतर केदार जाधव आणि विजय शंकर जोडीने फटकेबाजी करत संघाला ३३६ धावांचा टप्पा गाठून दिला. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने ३ तर हसन अली आणि वहाब रियाझ यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.