नवी दिल्ली : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक स्पर्धेतील लढतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र ३० मेपासून इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सर्व सामने नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पष्ट केले आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवरं १६ जून रोजी मँचेस्टर येथे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून भारताने माघार घ्यावी, अशी मागणी भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने केली आहे. याविषयी आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितले की, ‘‘हा सामना रद्द करण्यात यावा, अशा प्रकारचे कोणतेही संकेत मिळाले नाहीत. या हल्ल्यात ज्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आम्ही आमच्या सदस्य देशांमार्फत या परिस्थितीचे निरीक्षण करीत आहोत.’’ ‘‘खेळामध्ये विशेष करून क्रिकेटमध्ये दोन्ही देशांतील लोकांना, समाजाला एकत्र आणण्याची क्षमता आहे. त्याच धर्तीवर आम्ही आमच्या सदस्य देशांबरोबर काम करीत आहोत,’’ असेही त्यांनी सांगितले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘हरभजनने आपली मते मांडली आहेत. इतिहासावर नजर टाकल्यास हे लक्षात येते की, कारगिल युद्ध सुरू असतानाच भारत आणि पाकिस्तान यांच्यात इंग्लंडमध्ये १९९९च्या विश्वचषकातील सामना रंगला होता.’’