भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरोधात होणार आहे. या सामन्याआधी आफ्रिकेचे आघाडीचे गोलंदाज लुंगी एंगीडी आणि डेल स्टेन या दोघांना दुखापतीमुळे सामन्यांना मुकावे लागणार आहे. कोणताही संघ कधीही चांगली कामगिरी करू शकतो आणि कोणताही संघ कधीही खराब कामगिरी करू शकतो. आपण या स्पर्धेत काही अनपेक्षित निकाल पहिले आहेत, त्यामुळे आम्ही या स्पर्धेत कोणत्याही संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने भारताची विश्वचषक स्पर्धेची सुरुवात होणार आहे. त्याआधी त्याने पत्रकार परिषद घेतली.

“प्रत्येक सामना खेळताना सामन्यासाठी कशा पद्धतीचे वातावरण आहे, खेळपट्टीचा पोत कसा आहे, अशा विविध गोष्टी आम्हाला पाहाव्या लागणार आहेत. इतरांपेक्षा आमच्यासाठी ही गोष्ट समजणे काहीसे अवघड असेल. कारण आमचा पहिला सामना खूपच उशिरा होत आहे. पण तरीदेखील आम्हाला लवकरात लवकर तेथील वातावरण आणि इतर गोष्टींचा अभ्यास करावा लागणार असून त्यानुसार आम्हला आमच्या योजना आखाव्या लागतील”, असे विराट म्हणाला.

भारतीय संघाबाबत देखील त्याने आपले मत स्पष्ट केले. “या स्पर्धेसाठी निवडलेला १५ खेळाडूंचा संघ हा अत्यंत समतोल संघ आहे. या खेळाडूंमुळे कर्णधार म्हणून मला अनेक पर्याय उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संघात कधी ३ वेगवान गोलंदाज खेळतील, तर कधी २ मनगटी फिरकीपटू खेळतील; तर कधी १ मनगटी फिरकीपटू, बोटाने चेंडू फिरवणारा १ फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज असे काही समीकरण घेऊन टीम इंडिया मैदानावर उतरू शकेल. भारतीय संघात रवींद्र जाडेजाची महत्वाची भूमिका असेल. तो भारताच्या संघासाठी खूप फायद्याचा खेळाडू आहे. तो गोलंदाजी आणि फलंदाजी दोनही आघाड्यांवर चांगली कामगिरी करू शकतो. या साऱ्या गोष्टी पाहता आम्ही सर्व आघाड्यांवर समतोल असा संघ निवडला आहे”, असेही विराटने सांगितले.