विश्वचषक स्पर्धेमध्ये ४४ वर्षांनंतर प्रथमच इंग्लंडने जेतेपदावर नाव कोरण्याचा भीमपराक्रम अंतीम सामन्यामध्ये केला. आत्तापर्यंतच्या विश्वचषक स्पर्धांमधील सर्वात थरारक अशा अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय मिळवत पहिल्यांदाच विश्वविजेता होण्याचा मान पटकावला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी १५-१५ धावा केल्याने सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले. या थरारक विजयाबरोबरच इंग्लंडने विश्वचषकाच्या ४४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरले. या विजयानंतर इंग्लंडला चषकाबरोबरच ४ मिलीयन अमेरिकन डॉलर (२७ कोटी ४१ लाख ५८ हजार रुपये) बक्षिसाची रक्कम म्हणून मिळाली आहे. तर उपविजेत्या न्यूझीलंडला इंग्लंडच्या अर्धी म्हणजेच ४ मिलीयन अमेरिकन डॉलर (१३ कोटी ७० लाख ७९ हजार रुपये) इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे.

याशिवाय उपांत्य फेरीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक संघाला ५ कोटी ४८ लाख ३१ हजार ६०० रुपये बक्षीस मिळाले आहेत. साखळी फेरीत बाद झालेल्या संघांना प्रत्येकी एक लाख अमेरिकन डॉलर (६८ लाख ५३ हजार ९५० रुपये) देण्यात आले. याशिवाय साखळी फेरीत प्रत्येक सामना जिंकणाऱ्या संघाला २७ लाख ४१ हजार रुपये (४० हजार डॉलर) बक्षीस म्हणून देण्यात आले. त्यामुळे प्रत्येक संघाला मिळालेली रक्कम ही काही लाखांमध्ये आहे. जाणून घेऊयात कोणत्या संघाने एकूण किती पैसे कमावले

विजेता संघ
इंग्लंड – २९ कोटी ०६ लाख ०७ हजार ४८० रुपये (४२ लाख ४० हजार डॉलर)

उप विजेता  संघ
न्यूझीलंड – १५ कोटी ०७ लाख ८६ हजार ९०० रुपये (२२ लाख डॉलर)

भारत
७ कोटी ४० लाख २२ हजार ६६० रुपये (१० लाख ८० हजार डॉलर)

ऑस्ट्रेलिया
७ कोटी ४० लाख २२ हजार ६६० रुपये (१० लाख ८० हजार डॉलर)

पाकिस्तान
२ कोटी ५ लाख ६१ हजार ८५० रुपये (३ लाख डॉलर)

श्रीलंका
१ कोटी ५० लाख ७८ हजार ६९० रुपये (२ लाख २० हजार डॉलर)

द. आफ्रिका
१ कोटी ५० लाख ७८ हजार ६९० रुपये (२ लाख २० हजार डॉलर)

बांगलादेश
१ कोटी ५० लाख ७८ हजार ६९० रुपये (२ लाख २० हजार डॉलर)

वेस्ट इंडिज
१ कोटी २३ लाख ३७ हजार ११० रुपये (१ लाख ८० हजार डॉलर)

आफगाणिस्तान
६८ लाख ५३ हजार ९५० रुपये (१ लाख डॉलर)

भारताच्या कमाईचा हिशोब

साखळी फेरीमध्ये प्रत्येक सामना जिंकल्यावर ४० हजार डॉलर रक्कम दिली गेली. हा हिशोबाने भारताने साखळी फेरीमध्ये सात सामने जिंकले. त्यानुसार त्यांनी २ लाख ८० हजार डॉलर म्हणजेच एक कोटी ९१ लाख ९१ हजार ६० रुपये कमावले. (एका अमेरिकन डॉलरला ६८ रुपये ८० पैसे दराने) उपांत्य फेरीतील सामन्यामध्ये भारताचा पराभव झाला तरी भारताला उपांत्य फेरीत प्रवेश केल्याबद्दल ८ लाख डॉलर रक्कम मिळाली. ही रक्कम भारतीय चलनामध्ये ५ कोटी ४८ लाख ३१ हजार ६०० इतकी होते. एकंदरीत भारतीय संघाला ७ कोटी ४० लाख २२ हजार ६६० रुपये इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली. २०११ साली विश्वचषक जिंकला तेव्हा भारताला बक्षीस म्हणून एकूण १७ कोटी २२ लाख ५० हजार रुपये मिळाले होते. २०१५ साली ही कमाई अवघी ५ कोटी ७४ लाख २० हजार इतकी होती.