भारतीय संघाच्या २०११ आणि २०० विश्वचषक विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या युवराज सिंगने युवा फलंदाज ऋषभ पंतची पाठराखण केली आहे. भारतीय संघाच्या उपांत्य सामन्यातील पराभवानंतर अनेक दिग्गजांनी पंतवर टीका केली होती. या सामन्यात पंतने चौथ्या क्रमांकावर येऊन खेळपट्टीवर जमही बसवला होता; पण खराब फटका मारून आपली विकेट दिली. त्यानंतर पीटरसनने ट्विट करत पंतच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली. पीटरसनने पंतला चौथ्या क्रमांकावर का खेळवलं यावरही प्रश्न उपस्थित केले होते. पीटरसनशिवाय अनेक दिग्गज खेळाडूंनी पंतच्या चुकीच्या फटक्यावर ताशेरे ओढले होते. युवराजने मात्र पंतची पाठराखण केली आहे. पंत नवीन आहे आणि अनुभवातून तो सगळं काही शिकेल असे युवराजने म्हटले आहे. ऋषभ पंतला पाठींबा देताना युवी म्हणाला की, ' ऋषभ पंतकडे फक्त आठ आंतरराष्ट्रीय एकदिवसी सामन्यांचा अनुभव आहे. यात त्याची काहीच चूक नाही. तो अनुभवातून शिकेल आणि मोठा खेळाडू होईल. असे म्हणत युवीने पीटरसनला झापले आहे. युवराजने पीटरसनलाही राग येणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आहे. ट्विटच्या अखेरीस युवराज म्हणतो, प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार आहे. पंत बाद झाल्यानंतर पीटरसनने ट्विट करत टीकास्त्र सोडलं होतं. पंतला तुम्ही अशा चुका करताना कितीवेळा पाहिले. अशा चुकांमुळेच त्याला भारतीय संघात स्थान मिळत नव्हते. हे अतिशय दयनीय आहे. असे ट्विट पीटरसनने केलं होतं. He’s played 8 Odis ! It’s not his fault he will learn and get better it’s not pathetic at all ! However we all are entitled to share our opinions — yuvraj singh (@YUVSTRONG12) July 10, 2019 दरम्यान, उपांत्य सामन्यात २४० धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची आघाडी फळी कोलमडली होती. पंतने चौथ्या क्रमांकावर येत चांगला जम बसवला होता. पंत मोठी खेळी करेल असे वाटत असतानाच ३२ धावांवर तो बाद झाला. चांगल्या सुरूवातीनंतर पंतला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. त्यामुळे त्याच्यावर दिग्गजांनी टीका केली. उपांत्या सामन्यात भारताचा १८ धावांनी पराभव झाला. या सामन्यात रविंद्र जाडेजा आणि धोनीने अर्धशतकी खेळी करत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र, त्यांना भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले.