बंडखोरांच्या कारवाया पुढेही अशाच सुरू राहिल्या, तर मणिपूर सोडून दुसऱया कुठल्यातरी राज्यात स्थायिक व्हायचा निर्णय अत्यंत जड अंतकरणाने मला घ्यावा लागेल, असे आंतराष्ट्रीय ख्यातीची मुष्टियोद्धा मेरी कोम हिने म्हटले आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत तिने मणिपूरबद्दल आपल्याला वाटणारे प्रेम व्यक्त करतानाच तेथील दहशतीच्या वातावरणाची भीतीही वाटत असल्याचे म्हटले आहे.
गेल्याच आठवड्यात बंडखोर दहशतवाद्यांनी केलेल्या कारवाईत मणिपूरमध्ये भारतीय लष्कराचे १८ जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे मेरी कोमही अस्वस्थ झाली आहे. या घटनेनंतर गेल्या काही वर्षांत बंडखोरांनी तिथे केलेल्या कारवायांच्या आठवणी तिच्या मनात जाग्या झाल्या. या पार्श्वभूमीवर ती म्हणाली, सद्यस्थितीत मणिपूरमध्ये राहायचे की दुसऱया राज्यात स्थलांतरित व्हायचे, हे ठरविणे अवघड आहे. माझे संपूर्ण कुटूंब तिथे आहे शिवाय माझी अकादमीही तिथेच आहे. पण सातत्याने दहशतीच्या छायेखाली आम्ही राहू शकणार नाही. बंडखोरांच्या कारवाया अशाच सुरू राहिल्या, तर मला ते मणिपूरसोडून दुसऱया राज्यात स्थायिक होण्याचा विचार करावा लागेल. आयुष्यातील अनेक वर्षे मणिपूरमधील दहशतीच्या छायेखाली घालवली आहेत. आम्हाला बॉम्बस्फोट, रक्तपात याची भीती वाटते. कोणत्याच नागरिकाला हे आवडत नाही. मला मुलं आहेत. पण सगळे कुटूंबच सारखे भीतीच्या वातावरणात असते. लहानपणीपण मला या सगळ्या स्थितीत आपण कसे राहणार, याची काळजी वाटत होती, असे तिने म्हटले आहे.