स्पॉटफिक्सिंग प्रकरणात श्रीशांत दोषी आढळल्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्याच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीच्या सर्व नोंदी रद्द करण्याची शिफारस आंतराष्ट्रीय क्रिकेट मंडळाकडे करणार आहे. त्याचबरोबर श्रीशांतला २०११ च्या विश्वचषकात आणि २००७ च्या टी२० विश्वचषकात सामनावीरासह मिळालेली सर्व पदके परत करावी लागतील.

“ऑलिंम्पिकमध्ये ज्याप्रमाणे खेळाडू दोषी आढळल्यास त्याची सर्व पदके काढून घेतली जातात, त्याचप्रमाणे श्रीशांतला देखील भारताकडून खेळताना मिळालेली पदके परत करावी लागतील. त्याचबरोबर बीसीसीआय श्रीशांतच्या देशांतर्गत व आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व नोंदी रद्द करण्याची शिफारस करणार असून, मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवासन त्याला तयार झाले आहेत.” अशी माहीती रविवारी चेन्नईत झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीला हजर असणा-या एका सूत्राने दिली.

हे तीन खेळाडू दोषी आढळल्यास क्रिकेट नियामक मंडळ त्यांच्याबाबतीत कोणत्याही प्रकारची हयगय करणार नाही, असा इशारा श्रीनिवासन यांना दिला आहे. “चार खेळाडू दोषी आढळले, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. बीसीसीआय कोणाचीही गय करणार नाही. अंतर्गत तपासणी अहवाल आल्यावर आम्ही पुढची कारवाई करणार आहोत.” असे त्या सूत्रांने सांगितले.
या आगोदर बीसीसीआयने मॅच फिक्सिंग प्रकरणात २००० साली मोहम्मद अझरूद्दीन आणि अजय शर्मा या दोन आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंवर बंदी घातली होती. नंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने अझरूद्दीनवरील बंदी उठवली.