सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. भारताचा पारंपरिक शेजारी म्हणून ओळख असलेल्या पाकिस्तानातही सध्या करोनामुळे भीषण परिस्थिती तयार झाली आहे. अशा खडतर परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानने एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचं मत माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केलं आहे. यावेळी शोएबने भारताकडे पाकिस्तानसाठी व्हेंटिलेटर तयार करण्याची विनंती केली.

“भारताने आमच्यासाठी १० हजार व्हेंटिलेटर बनवावेत…पाकिस्तान हे उपकार कधीच विसरणार नाही.” शोएब पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होता. यावेळी बोलत असताना शोएबने भारतात समालोचक म्हणून काम करतानाच्या आठवणींना उजाळा दिला. “भारतामधील लोकांनी मला जे प्रेम दिलंय त्यासाठी मी त्यांचा कायम ऋणी राहीन. मी आतापर्यंत भारतात जेवढी कमाई केली, त्याच्या ३० टक्के रक्कम मी तिकडच्या गरीब लोकांमध्ये दान केली आहे. कित्येकदा टिव्ही स्टुडीओत काम करणाऱ्या गरीब कर्मचाऱ्यांनाही मी मदत केली आहे. माझा ड्रायव्हर, वॉचमन सगळ्यांची काळजी मी घ्यायचो. अनेकदा मी सायन, धारावीमध्ये त्यांच्या घरी गेलो आहे. जर मी या देशात काम करतोय तर तिकडच्या माझ्या सहकाऱ्यांना माझ्याकडून थोडी मदत व्हावी असा माझा हेतू असायचा.”

नुकतच शोएबने करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाक क्रिकेट मालिका खेळवण्याची मागणी केली होती. “सध्याचा काळ सर्वांसाठी खडतर आहे, अशा परिस्थितीत मी दोन्ही देशांमध्ये ३ सामन्यांची मालिका खेळवण्यात यावी असा पर्याय सुचवतो आहे. या सामन्यांचा निकाल काय लागेल याकडे दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींनी गंभीरतेने पाहू नये. विराट कोहलीने शतक झळकावलं तर त्याचा आनंद पाकिस्तानातील लोकांना झाला पाहिजे, बाबर आझमने शतक झळकावल्यानंतर भारतामधील चाहते खुश झाले पाहिजेत. प्रदीर्घ कालावधीनंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच क्रिकेट मालिका खेळत असल्यामुळे या सामन्यांना टिव्हीवर चांगली प्रेक्षकसंख्या लाभेल. यामधून मिळणारा निधी हा दोन्ही देशांच्या सरकारने करोनाविरुद्ध लढ्यात वापरावा.”