विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बांगलादेशवर कसोटी मालिकेत २-० असं निर्विवाद वर्चस्व राखलं. इंदूर आणि कोलकाता कसोटी सामन्यात भारतीय संघाने डावाने विजय मिळवत, कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेतलं आपलं अव्वल स्थानही कायम राखलं आहे. या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपला सहकारी रविंद्र जाडेजाचं कौतुक केलं आहे.

अवश्य वाचा – सचिनचा सल्ला आला कामी, विराटने झळकावलं दिवस-रात्र कसोटीतलं पहिलं शतक

विराट कोहलीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर, ऋषभ पंत-जाडेजा आणि स्वतःचा सरावसत्रादरम्यानचा एक फोटो पोस्ट केला आहे. यावेळी रविंद्र जाडेजासारख्या खेळाडूला मागे टाकणं हे निव्वळ अशक्य असल्याचं विराटने म्हटलं आहे.

दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा हा सलग सातवा विजय ठरला आहे. याचसोबत कसोटीत सलग ४ सामने डावाने जिंकण्याचा मानही भारतीय संघाला मिळाला आहे. याआधी २०१३ साली भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सलग ६ विजयांची नोंद केली होती. २०१९ वर्षातला भारतीय संघाचा हा अखेरचा कसोटी सामना होता. यानंतर भारतीय संघाला घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादीत षटकांच्या क्रिकेट मालिकेला सामोरं जावं लागणार आहे.

अवश्य वाचा – ICC Test Championship Points Table : भारताचं अव्वल स्थान अधिक बळकट