पंडय़ाचे नाबाद अर्धशतक; विदर्भावर सहा विकेट्सने मात
सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात बडोद्याचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ा ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी निवड समितीचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरला. त्याच्या धडाकेबाज नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर बडोद्याने विदर्भावर सहा विकेट्स राखून मात केली. वानखेडेवर झालेल्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने १६२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा बडोद्याने यशस्वीरीत्या पाठलाग करत बाद फेरीतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला.
बडोद्याने नाणेफेक जिंकत विदर्भाला फलंदाजीसाठी पाचारण केले. विदर्भाला १७ धावांवर पहिला धक्का बसला. पण त्यानंतर गणेश सतीश आणि जितेश शर्मा (३५) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी रचत संघाला स्थिरस्थावर केले. जितेश आणि गणेश ठरावीक फरकाने बाद झाल्यावर विदर्भाचा संघ अडचणीत सापडला होता.
गणेशने ३१ चेंडूंत ६ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५४ धावा केल्या. तो बाद झाल्यावर अपूर्व वानखेडेने तडफदार खेळी साकारल्यामुळे विदर्भाला दीडशे धावांची वेस ओलांडता आली. अपूर्वने २४ चेंडूंमध्ये एक चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४० धावांची खेळी केली. विदर्भाच्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बडोद्याची सुरुवात आश्वासक झाली नव्हती. पण हार्दिकने विदर्भाच्या गोलंदाजांचा समाचार घेत बडोद्याच्या बाजूने सामना झुकवला. या खेळीत हार्दिकने अप्रतिम फटक्यांची मेजवानी चाहत्यांना दिली. ४६ चेंडूंमध्ये त्याने ३ चौकार आणि तब्बल आठ षटकार लगावत त्याने नाबाद ८६ धावांची खेळी साकारली. हार्दिकने १९व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर लाँग ऑनवर षटकार खेचत दिमाखदारपणे संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ : २० षटकांत ५ बाद १६२ (गणेश सतीश ५४, अपूर्व वानखेडे ४०; स्वप्निल सिंग २/४१) पराभूत वि. बडोदा : १९ षटकांत ४ बाद १६८ (हार्दिक पंडय़ा नाबाद ८६; रवी जांगिड २/३६).

..ते पतंग उडवीत होते!
ए ढिल दे ढिल.. घसीट.. बदव.. पतंग बदव.. पेच लाव.. मकर संक्रांतीला हे शब्द ऐकू येणे स्वाभाविक आहेच, पण या आरोळ्या वानखेडे स्टेडियमवर येतील, यावर काहींचा विश्वास बसणार नाही. ट्वेन्टी-२० सामन्यात केरळचा पतंग कापल्यावर आपला आनंद साजरा करण्यासाठी मुंबईचे खेळाडू मैदानात उतरले ते पतंग उडवण्यासाठी. खास मकर संक्रांतीसाठी या खेळाडूंनी पतंग आणि मांजा अशी तयारी आधीच केली होती.
सामना संपल्यावर राखीव खेळाडू इक्बाल अब्दुल्ला पहिल्यांदा पतंग उडवण्यासाठी मैदानात आला. त्याच्यापाठोपाठ धवल कुलकर्णी आणि सिद्धेश लाडही आले. इक्बालचा पतंग कापला गेल्याने निराश होऊन तो परतला. धवल पतंग चांगला बदवत असला तरी त्याच्याकडे जास्त मांजा नव्हता. त्यामुळे त्याला जास्त पतंग बदवता आली नाही. दुसरीकडे सिद्धेशने तर मांजाची फिरकीच आणली होती.
दुसऱ्या प्रयत्नामध्ये तो पतंग उडवण्यात यशस्वी ठरला आणि वानखेडेच्या दिव्यांच्या मनोऱ्यापर्यंत त्याने पतंग बदवली. नंतर एकमेकांबरोबर पेच लावण्याचा आनंदही त्यांनी लुटला. संघ सहकारी आणि व्यवस्थापकही यावेळी पॅव्हेलियनमधून या पतंगबाजीचा आनंद लुटत होते. त्यानंतर आता चला, असे म्हणत कर्णधार आदित्य तरे मैदानात दाखल झाला खरा, पण त्यालाही पतंगबाजीचा मोह आवरला नाही.
खेळाडूंना पतंग उडवण्यात त्यानेही मदत केली. क्रिकेट स्पर्धाच्या व्यापातून मुंबईच्या खेळाडूंनी यावेळी मनमुरादपणे पतंग उडवण्याचा आनंद लुटला आणि शनिवारच्या दुसऱ्या सामन्याच्या तयारीसाठी त्यांनी पुन्हा पॅव्हेलियन गाठले.