भारत ‘अ’ संघाने चार दिवसीय कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघावर सहा विकेट राखून विजय मिळवला. भारतीय फिरकीपटूंनी दुसऱ्या डावातही सुरेख गोलंदाजी केली. या विजयाबरोबरच दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत राखण्यात भारताला यश आले. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दिलेले ५५ धावांचे आव्हान भारताने चार फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

सोमवारच्या २ बाद ३८ धावांवरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली. तिसऱ्या विकेटसाठी हेड व हँड्सकॉम्ब यांनी ७९ धावांची भागीदारी रचत सामन्यात अनिर्णीत राखण्याच्या दिशेने कूच केली. मात्र प्रथम शाहबाज नदीमने हेडला (४७) व कुलदीप यादवने हँड्सकॉम्बला (५६) धावांवर बाद करत सामन्यात चुरस निर्माण केली. कृष्णप्पा गौथमनेही कर्णधार मिशेल मार्शला (३६) त्रिफळाचीत करत ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले. पुढे नदीम, गौथम व कुलदीप यांनी शेपटाला झटपट गुंडाळत ऑस्ट्रेलियाचा डाव २१३ धावांवर संपुष्टात आणला. भारतातर्फे कुलदीपने तीन व गौथम,नदीमने प्रत्येकी दोन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक :

ऑस्ट्रेलिया ‘अ’ (दुसरा डाव) : १०२.५ षटकांत सर्वबाद २१३ (पीट हँड्सकॉम्ब ५६, ट्रेविस हेड ४७; कुलदीप यादव ३/४६).

भारत ‘अ’ (दुसरा डाव) : ६.२ षटकांत ४ बाद ५५ (अंकित बावणे २८; मायकेल नेसेर २/२६).