अफगाणिस्तानच्या संघाचा आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने धुव्वा उडवला. आयसीसीकडून कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळालेल्या या संघाला कसोटी क्रिकेटमधली सुरुवात फारशी चांगली करता आली नाही. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताने अफगाणिस्तानवर १ डाव आणि २६२ धावांनी विजय मिळवला. हा भारताचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय ठरला.

या सामन्यात वेगवान भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यांनी अफगाणिस्तानच्या फलंदाजांवर सतत अंकुश ठेवला. त्यामुळे हा सामना सहज जिंकणे भारताला शक्य झाले. अवघ्या दोन दिवसांत या सामन्याचा निकाल लागला. हा सामना भारतासाठी तर विशेष ठरलाच, पण त्यापेक्षा महत्वाचा ठरला तो वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्यासाठी. या सामन्यात त्याने १०० कसोटी बळींचा टप्पा गाठला.

कसोटी क्रिकेटमध्ये १०० बळी टिपणारा उमेश यादव हा भारताचा आठवा वेगवान गोलंदाज ठरला आहे. या कामगिरी बरोबरच त्याने मोठमोठ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले. या यादीत अग्रभागी माजी क्रिक्रेटपटू कपिल देव आहे. त्यांनी कसोटीमध्ये ४३४ बाली टिपले होते. त्यापाठोपाठ झहीर खानने ३११ बळी टिपले आहेत. त्यांनतर जवागल श्रीनाथ (२३६), इशांत शर्मा (२३४), मोहम्मद शमी (११०), कर्झन घावरी (१०९) आणि इरफान पठाण (१००) या दिग्ग्ज गोलंदाजांची नावे आहेत. या यादीत त्याने स्थान मिळवले आहे.