ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटी सामन्यात भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली आहे. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल हे भारताचे सलामीवीर मैदानात उतरले. मुंबईकर पृथ्वी शॉने आपल्या अपयशी खेळाची मालिका पुढे सुरु ठेवली. मिचेल स्टार्कच्या दुसऱ्याच चेंडूवर पृथ्वी शॉ शून्यावर माघारी परतला.

पहिल्याच षटकात माघारी परतल्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी पृथ्वीला ट्रोल केलं आहे.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करताना टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने शुबमन गिलऐवजी पृथ्वी शॉवर विश्वास दाखवत त्याला संघात स्थान दिलं होतं. ज्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येत होती. पृथ्वी शॉनेही मिळालेल्या संधीचं सोनं न करता टीकाकारांच्या हातात आयतं कोलित दिलं आहे.