IND vs AUS 2nd ODI : भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या २५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला केवळ २४२ धावाच करता आल्या. मार्कस स्टॉयनीसचे अर्धशतक (५२) आणि पीटर हँड्सकॉम्बची ४८ धावांची खेळी त्यांना सामना जिंकवून देऊ शकली नाही. कोहलीचे दमदार शतक आणि बुमराह-विजय शंकरचा भेदक मारा याच्या जोरावर भारताने सामना जिंकला आणि ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. २५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सावध सुरुवात केली. पण चांगली सुरुवात मिळाल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्यात कर्णधार फिंच अपयशी ठरला. त्याने ५३ चेंडूत ३७ धावा केल्या. मोठा फटका खेळताना तो पायचीत झाला. कुलदीपने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. फिंच पाठोपाठ लगेचच दुसरा सलामीवीर उस्मान ख्वाजा बाद झाला. केदार जाधवने त्याला बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. ख्वाजाने ३७ चेंडूत ३८ धावा केल्या. आजच्या सामन्यात संधी देण्यात आलेला अनुभवी शॉन मार्श आपली छाप उमटवण्यात अपयशी ठरला. त्याने २७ चेंडूत १६ धावा केल्या. जाडेजाने त्याला माघारी धाडले आणि ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. टी २० मालिकेत भारतासाठी धोकादायक ठरलेला फलंदाज ग्लेन मॅक्सवेल त्रिफळाचीत झाला. आडवा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याला कुलदीप यादवने त्रिफळाचीत केले. उत्तम खेळ करत अर्धशतकाकडे वाटचाल करणारा पीटर हँड्सकॉम्ब त्यानंतर धावबाद झाला. जाडेजाने अप्रतिम थ्रो मारून त्याला माघारी पाठवले. त्याने ५९ चेंडूत ४८ धावा केल्या. चांगली खेळी करणारा अलेक्स कॅरीदेखील लगेच त्रिफळाचीत झाला. त्याला कुलदीपने बाद केले आणि ऑस्ट्रेलियाचा सहावा गडी माघारी पाठवला. तळाच्या फळीतील फलंदाज नॅथन कुल्टर नाईल आणि पॅट कमिन्स हे देखील झटपट बाद झाले. अखेर दडपणाच्या वेळी अर्धशतकवीर मार्कस स्टॉयनीस बाद झाला आणि शेवटी झॅम्पाला बाद करत विजय शंकरने भारताच्या विजयावर शिकामोर्तब केले. त्याआधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने डावाला अप्रतिम सुरुवात करून दिली. पहिलं षटक निर्धाव टाकत त्याने स्फोटक अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याला तंबूत पाठवले. रोहितला भोपळाही फोडता आला नाही. मॅक्सवेलला गोलंदाजी देणे ऑस्ट्रेलियाचा लाभदायक ठरले. शिखर धवन (२१) ला त्याने पायचीत पकडले. पंचांनी नाबाद ठरवल्याने ऑस्ट्रेलियाने DRS ची मदत घेतली, त्यात तिसऱ्या पंचानी ऑस्ट्रेलियाच्या बाजूने कौल दिला. लायनच्या पहिल्याच षटकात अंबाती रायडू (१८) पायचीत झाला. भारताने DRS ची मदत घेतली. पण निकाल भारताच्या विरोधात लागल्याने एकमेव रिव्ह्यू गमावत भारताला तिसरा धक्का बसला. पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेला कर्णधार विराट कोहली आजच्या सामन्यात चमकला. त्याने ५५ चेंडूत आपले अर्धशतक ठोकले. पण चांगली सुरुवात करून ४६ धावांची खेळी करणारा विजय शंकर कमनशिबी ठरला. कोहलीने लगावलेला चेंडू थेट नॉन स्ट्राईकच्या स्टंपवर आदळला. त्या दरम्यान चेंडू गोलंदाजाच्या हाताला स्पर्श करून गेला होता. त्यामुळे विजय शंकर धावबाद झाला. पहिल्या सामन्यात भारताला विजय मिळवून देणारी जोडी केदार जाधव आणि महेंद्रसिंग धोनी हे दोघे एका पाठोपाठ एक बाद झाले. झॅम्पाने २ चेंडूत २ बळी मिळवले. केदार जाधव ११ तर धोनी पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. चौकार लगावत कर्णधार कोहलीने आपले दमदार शतक ठोकले. त्याने १०७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ४० वे शतक ठरले. मात्र शेवटच्या काही षटकात भारताने झटपट गडी गमावले. जाडेजा (२१) झेलबाद झाला, तर कोहली शतक लगावून ११६ धावांवर माघारी परतला. तळाचा फलंदाज कुलदीप यादवदेखील त्रिफळाचीत झाला. त्याला पॅट कमिन्सने माघारी धाडले. पाठोपाठ बुमराहही शून्यावर बाद झाला. त्यामुळे भारताचा डाव अडीचशे धावांवर आटोपला. पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ बळी टिपले. दरम्यान, या सामन्यात भारताकडून संघात बदल करण्यात आलेला नाही. मात्र ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. अनुभवी शॉन मार्श आणि फिरकीपटू नॅथन लायन यांना संघात स्थान देण्यात आले आहे. तर ऍश्टन टर्नर आणि जेसन बेहरेनडॉर्फ याना वगळण्यात आले आहे.