सलामीवीर रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली आणि मधल्या फळीत लोकेश राहुल यांनी केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर राजकोट वन-डे सामन्यात भारतीय संघाने ३४० धावांचा पल्ला गाठला आहे. पहिल्या सामन्याच्या तुलनेत दुसऱ्या वन-डेत भारतीय फलंदाजांची कामगिरी सुधारलेली पहायला मिळाली. कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात ७६ चेंडूत ७८ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ६ चौकारांचा समावेश होता.

अवश्य वाचा – Video : कोहलीच्या मनसुब्यांवर झॅम्पाचं पाणी, पुन्हा एकदा ठरला शिकार

या अर्धशतकी खेळीदरम्यान विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा विराट दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकरने ही कामगिरी करुन दाखवली होती.

गेल्या काही सामन्यांपासून विराट अनेक विक्रम मोडत आलेला आहे. सचिनचे अनेक विक्रम विराटने आपल्या नावे जमा केले आहेत. मात्र सचिनचा हा विक्रम मोडणं विराटला जमलेलं नाही. ४ हजार धावांचा टप्पा पूर्ण करायला विराटला ८६ डाव लागले, सचिनने ही कामगिरी ८३ डावांमध्ये केली होती.

दरम्यान, पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने दुसऱ्या सामन्यात डावाची सुरुवात सावधपणे केली. दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करत पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माला ४२ धावांवर बाद करत झॅम्पाने भारताची जमलेली जोडी फोडली. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी संघाचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

या दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. शिखर धवन आपल्या शतकापासून ४ धावा दूर असताना रिचर्डसनच्या गोलंदाजीवर स्टार्कने त्याचा झेल घेतला. यानंतर मैदानावर आलेला श्रेयस अय्यरही फारशी चमक दाखवू शकला नाही. यानंतर विराटने लोकेश राहुलच्या साथीने पुन्हा एकदा महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला आश्वासक धावसंख्येच्या दिशेने नेलं. यादरम्यान विराट कोहलीने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. विराट आपलं शतक झळकावणार असं वाटत असतानाच झॅम्पाने त्याचा अडसर दूर केला. त्याने ७८ धावांची खेळी केली.