India vs Australia 2nd T20 : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ गडी राखून विजय मिळवला. ग्लेन मॅक्सवेलने झंझावती शतक ठोकत ऑस्ट्रेलियाला एकहाती विजय मिळवून दिला. भारताने दिलेले १९१ धावांचे मोठे लक्ष्य त्याच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २ चेंडू राखून पार केले. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने २ सामन्यांची टी २० मालिका २-० अशी जिंकली. ग्लेन मॅक्सवेलला सामनावीर आणि मालिकावीर घोषित करण्यात आले. An outstanding knock of 113* from Maxwell guides the visitors to a 7-wkt victory in the second T20I. Australia win the series 2-0 #INDvAUS pic.twitter.com/CAdMFQdBa5 — BCCI (@BCCI) February 27, 2019 १९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ११ चेंडूत ७ धावांची सावध खेळी करणारा मार्कस स्टॉयनीस त्रिफळाचीत झाला आणि ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. त्याने १ चौकार लगावला. चांगल्या लयीत नसलेल्या कर्णधार फिंचला आजही अपयश आले. तो ८ धावांवर बाद झाला. त्याने केवळ १ चौकार लगावला. जोरदार फटकेबाजी करणारा डार्सी शॉर्ट ४० धावांवर झेलबाद झाला. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात त्याने विजय शंकरला बळी दिला आणि ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला. मात्र त्याने ४० धाव करत फटकेबाजी केली. त्यानंतर मॅक्सवेलने एकहाती डाव सांभाळला आणि फटकेबाजी करत शतक ठोकले. त्याने ७ चौकार आणि ९ षटकार ठोकत ५५ चेंडूत नाबाद ११३ धावा केल्या. त्याला पीटरने १८ चेंडूत २० धावा करून चांगली साथ दिली. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या राहुलचे अर्धशतक दुसऱ्या सामन्यात हुकले. तो २६ चेंडूत ४७ धावांची फटकेबाज खेळी करून बाद झाला. रोहितच्या जागी संधी मिळालेल्या शिखर धवनने सुरुवात चांगली केली मात्र तो २४ चेंडूत १४ धावा करून झेलबाद झाला. पहिल्या सामन्यात धावबाद झालेल्या ऋषभ पंतने या सामन्यात फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण त्याला त्यात अपयश आले. ६ चेंडूत १ धाव करून तो झेलबाद झाला. पण त्यानंतर कोळी आणि धोनीने डाव सावरत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. ३ चेंडूत ३ षटकार मारून कोहलीने फटकेबाजीची सुरुवात केली. त्यानंतर १ धाव काढत त्याने आपले धडाकेबाज अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३० चेंडूत अर्धशतक झळकावले. धोनीनेही त्याच्या सुरात सूर मिसळून तडाखेबाज खेळी केली. शेवटच्या षटकात धोनी २३ चेंडूत ४० धावा फटकावून बाद झाला. त्याने ३ चौकार आणि ३ षटकार लगावला. दिनेश कार्तिकनेही शेवटच्या ३ चेंडूंमध्ये २ चौकार हाणले. शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत कोहलीने भारताला १९० धावांपर्यंत पोहोचवले. कोहलीने नाबाद ७२ धावा केल्या. केवळ ३८ चेंडूत त्याने ६ षटकार आणि २ चौकार मारून तुफानी खेळी केली.