पहिल्या टी-२० सामन्यात ११ धावांनी विजय मिळवत टी-२० मालिकेची धडाकेबाज सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात निराशाजनक खेळ केला. गलथान क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांच्या स्वैर माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाने १९४ धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या सामन्यात Concissuion Substitute म्हणून मैदानात येऊन ३ बळी घेत हिरो ठरलेला चहल दुसऱ्या सामन्यात झिरो ठरला आहे.

आपल्या ४ षटकांच्या कोट्यात चहलने तब्बल ५१ धावा देत अवघा एक बळी घेतला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये तीनवेळा ५० पेक्षा जास्त धावा देणारा चहल हा एकमेव फिरकीपटू ठरला आहे.

नाणेफेक जिंकत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिंचच्या जागेवर ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणाऱ्या मॅथ्यू वेडने धडाकेबाज सुरुवात करत भारतावर दबाव आणायला सुरुवात केली. मॅथ्यू वेड आणि डार्सी शॉर्ट या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. अखेरीस नटराजनने डार्सी शॉर्टला माघारी धाडत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर कर्णधार वेडने स्मिथच्या साथीने छोटेखानी भागीरादीर करत संघाचा डाव सावरला. यादरम्यान वेडने आपलं अर्धशतकही साजरं केलं. परंतू वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर मैदानात उडालेल्या गोंधळता वेड धावबाद झाला. त्याने ३२ चेंडूत १० चौकार आणि एका षटकारासह ५८ धावा केल्या.

यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि स्टिव्ह स्मिथ यांनी फटकेबाजीला सुरुवात करत भारतावर दबाव आणायला सुरुवात केली. परंतू शार्दुलने मॅक्सवेलला माघारी धाडत भारताला महत्वाची विकेट मिळवून दिली, त्याने २२ धावा केल्या. भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या टी-२० सामन्यात गलथान क्षेत्ररक्षण केलं. ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धेतला. फटकेबाजी करणारा स्टिव्ह स्मिथही चहलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्याने ३८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४६ धावा केल्या. भारताकडून नटराजनने दोन तर शार्दुल ठाकूर आणि चहल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.