कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अष्टपैलू रविंद्र जाडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने मेलबर्न कसोटी सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. दुसऱ्या दिवसाअखेरीस भारतीय संघ ५ गडी बाद २७७ धावांपर्यंत मजल मारु शकला. अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नेटाने सामना करत नाबाद अर्धशतक झळकावलं. दिवसाअखेरीस अजिंक्य १०४ तर जाडेजा ४० धावांवर खेळत होता. दुसऱ्या दिवसाअखेरीस भारताकडे ८२ धावांची आघाडी आहे.

पहिल्या दिवशी एक गडी गमावत ३६ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर दुसऱ्या डावात भारताची सुरुवात काहीशी संमिश्र झाली. शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा झटपट माघारी परतले. यानंतर अजिंक्य रहाणेने हनुमा विहारीच्या साथीने संघाची पडझड थांबवत पहिलं सत्र खेळून काढलं. दुसऱ्या सत्रातही रहाणे-विहारी जोडीने संयमी फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. मात्र या भागीदारीत धावा जमवणं भारतीय फलंदाजांना जमलं नाही. हनुमा विहारी बाद झाल्यानंतर ऋषभ पंतने मैदानात येऊन फटकेबाजीला सुरुवात केली.

पंतला फटकेबाजी करताना पाहून अजिंक्यनेही मग आपल्या ठेवणीतले काही फटके लगावायला सुरुवात केली. मैदानावर पाय स्थिरावलेल्या अजिंक्यने मग ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. मध्यंतरीच्या काळात आपल्याला मिळालेल्या दोन जिवदानांचा फायदा घेत अजिंक्यने कसोटी क्रिकेटमधलं आपलं बारावं शतक झळकावलं. पंत माघारी परतल्यानंतर अजिंक्यने पुन्हा एकदा रविंद्र जाडेजासोबत शतकी भागीदारी रचत भारतीय डावाला आकार दिला. दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रात ढगाळ वातावरणामुळे सामना थांबवण्यात आला. त्यामुळे तिसऱ्या दिवशी भारतीय संघ आपली ८२ धावांची आघाडी किती वाढवू शकतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.