विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने ऐतिहासिक बॉक्सिंग डे कसोटीत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. मेलबर्नच्या मैदानावर पाय रोवून कांगारुंच्या माऱ्याचा सामना करत अजिंक्य रहाणेने शतक झळकावलं आहे. गेल्या काही सामन्यांत अजिंक्यला सूर गवसत नव्हता, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातही अजिंक्य आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला होता. मात्र विराट कोहली माघारी परतल्यानंतरही अजिंक्यने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने सांभाळत शतक झळकावून पहिल्या डावात संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

कसोटी क्रिकेटमधलं अजिंक्य रहाणेचं हे १२ वं शतक ठरलं. महत्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवसाच्या खेळात अजिंक्यने हनुमा विहारी, ऋषभ पंत आणि रविंद्र जाडेजा यांच्यासोबत महत्वपूर्ण भागीदारी करत भारतीय संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. हनुमा विहारीसोबत भागीदारी करताना सावध पवित्रा घेऊन खेळणाऱ्या अजिंक्यने ऋषभ पंत फलंदाजीला आल्यानंतर आक्रमक फलंदाजी करत संघाची धावगती वाढवण्यात मोलाची भूमिका बजावली.