IND vs AUS 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्टेलियाने भारतावर ३२ धावांनी विजय मिळवला. ३१४ धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव २८१ धावात आटोपला. कर्णधार विराट कोहलीने १२३ धावांची दमदार खेळी केली. पण इतर फलंदाजाकडून त्याला अपेक्षित साथ न मिळाल्यामुळे भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने विजयासह मालिकेत २-१ असे पुनरागमन केले. एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक साजरे करणाऱ्या उस्मान ख्वाजाला सामनावीर जाहीर करण्यात आले. That's that from Ranchi. Australia win by 32 runs. The series now stands at 2-1 Scorecard - #INDvAUS pic.twitter.com/95SOevYBx8 — BCCI (@BCCI) March 8, 2019 ३१४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या भारताला सुरुवातीलाच पहिला धक्का बसला. सलामीवीर शिखर धवन १ धाव करून बाद झाला. १४ चेंडूत १४ धावा करणारा भारताचा हिटमॅन रोहित शर्मा पायचीत झाला. त्याने २ चौकार आणि १ षटकार लगावत चांगली सुरुवात केली, पण तो मोठी खेळी करू शकला नाही. १४ चेंडूत १४ धावा करणारा भारताचा हिटमॅन रोहित शर्मा पायचीत झाला. त्याने २ चौकार आणि १ षटकार लगावत चांगली सुरुवात केली, पण तो मोठी खेळी करू शकला नाही. स्फोटक फलंदाज अंबाती रायुडू २ धावांवर त्रिफळाचीत झाला. अत्यंत सुंदर अशा चेंडूवर कमिन्सने त्याचा अडथळा दूर केला. त्याने ८ चेंडू खेळले. रांचीच्या मैदानावर सामना असल्याने तेथील 'लोकल बॉय' महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीवर साऱ्यांचे लक्ष होते. पण चांगली सुरुवात मिळाल्यानंतर तो झॅम्पाच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला आणि भारताला चौथा धक्का बसला. त्याने ४२ चेंडूत २६ धावा केल्या. एकीकडे गडी बाद होत असताना कोहलीने मात्र आपली लय कायम राखली. त्याने संयमी खेळी करत ५२ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. पण त्यानंतर मराठमोळा केदार जाधव झॅम्पाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला आणि भारताचा पाचवा गडी माघारी परतला. त्याने ३९ चेंडूत २६ धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या कर्णधार कोहलीने मात्र खेळ सुरु ठेवत आणि आपली लय कायम राखत तिसऱ्या सामन्यातही धडाकेबाज शतक ठोकले. पण तो त्रिफळाचीत झाला. त्याने ९५ चेंडूत १२३ धावा केल्या. या खेळीत त्याने १६ चौकार आणि १ षटकार ठोकला. जाडेजा आणि विजय शंकर या शेवटच्या फलंदाजांच्या जोडीवर भारताची मदार होती. मात्र धावगतीचा पाठलाग करताना विजय मोठा फटका खेळायला गेला आणि झेलबाद झाला. त्याने विराटला चांगली साथ दिली होती. पण त्याला केवळ ३२ धावा करता आल्या. चांगली फलंदाजी करणारा रवींद्र जाडेजा फटकेबाजी करताना बाद झाला. त्याने ३१ चेंडूत २४ धावा केल्या. पाठोपाठ शमीदेखील माघारी परतला. त्याने ४ चेंडूत ८ धावा केल्या. लगेचच कुलदीप यादवदेखील १० धावांवर झेलबाद झाला. त्यामुळे भारताचा ३२ धावांनी पराभव झाला. त्याआधी नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. ऑस्ट्रेलियाने धडाकेबाज फलंदाजी करत भारताला विजयासाठी ३१४ धावांचे आव्हान दिले आहे. सलामीवीर उस्मान ख्वाजाचे शतक (१०४) आणि कर्णधार फिंचची ९३ धावांची खेळी याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ५ बाद ३१३ धावा केल्या. स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यानेही ३१ चेंडूत ४७ धावांची झंझावाती खेळी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ ३५० धावांचा पल्ला गाठेल अशी अपेक्षा होती. मात्र शेवटच्या १५ षटकात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाला लगाम लावण्यात टीम इंडियाला यश आले. भारताकडून कुलदीपने सर्वाधिक ३ बळी टिपले. दरम्यान, भारताचा कर्णधार विराट कोहली याने मालिकेत प्रथमच नाणेफेक जिंकली होती. या सामन्यात भारताने संघात बदल केलेला नव्हता. मात्र ऑस्ट्रेलियाने संघात एक बदल केला होता. वेगवान गोलंदाज कुल्टर नाईलच्या जागी त्यांनी संघात झाय रिचर्डसनला स्थान दिले होते.