व्हाईटवॉशच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या विराट कोहलीच्या भारतीय संघाला तिसऱ्या टी-२० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ १७४ धावांपर्यंत मजल मारु शकला. कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत ८५ धावांची खेळी केली. परंतू भारताला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. १२ धावांनी ऑस्ट्रेलियाने सामन्यात बाजी मारत टी-२० मालिकेचा शेवट गोड गेला.

परंतू या अर्धशतकी खेळीदरम्यान विराटने भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्यात भूमीत ३ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा विराट दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

१८७ धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. ग्लेन मॅक्सवेल टाकत असलेल्या पहिल्याच षटकात लोकेश राहुल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. विराटने आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजी करत धावांचा ओघ वाढवण्यास सुरुवात केली. ही जोडी भारताचा डाव सावरणार असं वाटत असतानाच स्वेप्सनने शिखर धवनला माघारी धाडलं. यानंतर संजू सॅमसननेही तिसऱ्या सामन्यात निराशाजनक खेळ करत आपली विकेट फेकली.

दुसरीकडे विराटने एक बाजू लावून धरत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. सॅमसन माघारी परतल्यानंतर मैदानावर आलेला श्रेयस अय्यरही शून्यावर बाद झाला. यानंतर विराटने हार्दिक पांड्याच्या साथीने फटकेबाजी करत भारताचं आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न केला. डॅनिअल सम्सच्या गोलंदाजीवर सुरेख फटकेबाजी करत विराटने सामन्यात रंगत आणली. यानंतर हार्दिक पांड्यानेही रंगात येत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. परंतू कर्णधार फिंचने आपला हक्काचा फिरकीपटू झॅम्पाला पाचारण केलं, आणि १८ व्या षटकात पांड्याचा बळी घेत झॅम्पानेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. १९ व्या षटकात अँड्रू टायने विराटला माघारी धाडत भारताच्या उरल्यासुरल्या आशांवर पाणी फिरवलं.