ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताने २ बाद ९६ धावा केल्या. अनुभवी स्टीव्ह स्मिथचे शतक (१३१) आणि मार्नस लाबूशेन (९१) व विल पुकोव्हस्कीची (६२) अर्धशतके यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३८ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारतीय संघाने सुरूवात चांगली केली होती. पण खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर रोहित शर्मा आणि शुबमन गिल माघारी परतले. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने दिवसाचा खेळ संपेपर्यंत खेळपट्टी सांभाळली.

आणखी वाचा- IND vs AUS: स्मिथ = भारताची डोकेदुखी!! शतक ठोकत केला नवा विक्रम

दौऱ्यावरील आपला पहिलाच सामना खेळणारा रोहित शर्मा शुबमन गिलसोबत मैदानावर आला. या दोघांनी ७० धावांची दमदार भागीदारी केली. दोघेही शांत आणि संयमी खेळ करत होते. पण सामना जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर बचावात्मक फटका खेळताना रोहित झेलबाद झाला. त्याने ७७ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार लगावत २६ धावा केल्या. शुबमन गिलने डाव पुढे नेत आपलं पहिलं कसोटी अर्धशतक झळकावलं, पण त्यानंतर लगेचच तोही झेलबाद झाला. १०१ चेंडूत ८ चौकारांसह त्याने ५० धावा केल्या.

Video: एकच नंबर!! जाडेजाने स्मिथला ‘असं’ धाडलं तंबूत

त्याआधी, पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे डावावर वर्चस्व होते. सलामीवीर पुकोव्हस्की आणि मार्नस लाबूशेन यांनी अर्धशतके ठोकली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र भारतीय गोलंदाजांनी यजमानांना स्वस्तात रोखलं. स्टिव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन दोघे चांगला खेळ करत होते. पण लाबूशेन ९१ धावांवर बाद झाल्यावर स्मिथने एकट्याने बाजू लावून धरली. लाबूशेननंतरच्या सर्व फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन चाहत्यांची निराशा केली. मॅथ्यू वेड (१३), कॅमेरॉन ग्रीन (०), टीम पेन (१), पॅट कमिन्स (०), नॅथन लायन (०) हे सारे फलंदाज स्वस्तात परतले. मिचेल स्टार्कने फटकेबाजी करत २४ धावा केल्या. जाडेजाने ४, बुमराह व सैनीने २-२ तर मोहम्मद सिराजने १ बळी टिपला.