ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी चौथ्या डावात दमदार प्रत्युत्तर दिलं. ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या ऋषभ पंतने तडाखेबाज खेळी करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. त्यामुळेच भारताने चहापानाच्या वेळेपर्यंत ५ बाद २८० धावांपर्यंत मजल मारली. आता शेवटच्या सत्रात विजयासाठी भारताला १२७ धावांची तर ऑस्ट्रेलियाला ५ बळींची गरज आहे.

भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने पुजाराच्या साथीने पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरूवात केली. पहिल्या सत्रात रहाणे लगेचच बाद झाला. पण त्यानंतर ऋषभ पंतने सामन्याची सूत्र हाती घेतली. त्याने सुरूवातीला सावध खेळ केला, पण नंतर मात्र त्याने सुसाट फलंदाजी केली. त्याचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. पंतने १२ चौकार आणि ३ षटकारांची आतषबाजी करत ११८ चेंडूमध्ये ९७ धावा कुटल्या. नॅथन लायनच्या फिरकीपुढे तो बाद झाला. त्यानंतर काही वेळाने अत्यंत संयमी खेळी करणारा पुजारादेखील त्रिफळाचीत झाला. त्याने २०५ चेंडूत ७७ धावा केल्या.

आता शेवटच्या सत्रात रविचंद्रन अश्विन, हनुमा विहारी आणि रविंद्र जाडेजा यांच्यावर भारताची मदार आहे. जाडेजा दुखापतग्रस्त असला तरी गरज पडल्यास तो फलंदाजीला येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता शेवटच्या सत्रात भारतीय संघ सामना वाचवण्याकडे लक्ष पुरवतो की सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.