‘गाबा’च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अंजिक्य विजयरथ रोखत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८५ नाबाद) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतानं चौथ्या कसोटी सामन्यात तीन गडी राखून विजय मिळवला. या विजयासाह भारतानं बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ नं जिंकली आहे. या विजयानंतर भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने विजयश्री खेचून आणण्याऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन करतानाच त्यांना एक भन्नाट गिफ्टही दिलं आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनीच यासंदर्भातील घोषणा केली आहे.

सामाना संपल्यानंतर गांगुली यांनी ट्विटरवरुन भारतीय संघाला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर बीसीसीआयच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी एक मोठी घोषणाही केली आहे. “हा भन्नाट विजय आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन अशाप्रकारे मालिका विजय मिळवणे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हे कायम लक्षात ठेवलं जाईल,” अशा शब्दांमध्ये गांगुली यांनी भारतीय संघाच्या विजयानंतर आनंद व्यक्त केला. त्यानंतर पुढे त्यांनी, बीसीसीआयकडून भारतीय टीमला पाच कोटींचा बोनस जाहीर करण्यात येत आहे. खरं तर या विजयाची कोणत्याही आकड्यामध्ये तुलना करता येणार नाही. सर्व सदस्य खूप छान खेळले. अभिनंदन, असंही म्हटलं आहे.

आणखी वाचा- Ind vs Aus : भारताने सामना जिंकल्यानंतर Google चे CEO ही झाले खूष; ‘ते’ खास ट्विट झालं व्हायरल

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही ट्विटरवरुन भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. असे काही क्षण भारतीय क्रिकेटसाठी खूप खास असतात असं म्हणत जय शाह यांनी बीसीसीआयकडून भारतीय संघाला पाच कोटींचा बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा केलीय.

आणखी वाचा- ‘गाबा’चं घर खाली! कांगारुंवर ७० वर्षांनी नामुष्की, टीम इंडियाने रचला इतिहास

पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर भारतीय संघानं फिनिक्स पक्षाप्रमाणे कसोटी मालिकेवर नाव कोरलं आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं ८ गड्यानं विजय मिळवला. तर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीनं फलंदाजी करत तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळाच्या बळावर भारतीय संघानं विजय मिळवला.