२०२० हे वर्ष जगभरात विचीत्र घटनांसाठी ओळखलं जातंय. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रदीर्घ कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होतं. २०२० वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघ विराटच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडमध्ये ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळला होता. यानंतर थेट नोव्हेंबर महिन्यात भारताने विराटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळली.

वन-डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या खराब कामगिरीचं सत्र कायम राहिलं आहे. परंतू विराट कोहलीच्या बाबतीत यंदा पहिल्यांदाच एक दुर्दैवी योगायोग जुळून आला आहे. २००८ साली आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या विराटला त्या वर्षात एकही शतक झळकावता आलं नव्हतं. यानंतर तब्बल १२ वर्षांनी विराटवर ही नामुष्की ओढावली आहे.

आणखी वाचा- Ind vs Aus : सलग दुसऱ्या सामन्यांत विराटने मोडला सचिनचा विक्रम, दिग्गजांच्या पंगतीत स्थान

पहिले दोन सामना गमावल्यानंतर तिसऱ्या वन-डे सामन्यातही भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी सुरुच राहिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाच्या फलंदाजांनी एकामागोमाग एक माघारी परतण्याचा सिलसिला कायम ठेवला. विराटने एकाकी झुंज देत ६३ धावांची खेळी केली. पण जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक कॅरीकडे झेल देत तो माघारी परतला.