भारतीय संघ ६ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारताचे पारडे जाड मानले जात असले तरी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करतील यात शंका नाही. त्यामुळे भारताला जर मालिका जिंकायची असेल तर भारताला सलामी जोडीबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. कारण सलामी जोडीवर टीम इंडियाची भिस्त आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जॉन बुचानन यांनी व्यक्त केले आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जॉन बुचानन

भारताला मालिका जिंकून इतिहास रचण्याची संधी आहे. पण त्यांचे फलंदाज पूर्ण मालिकेत कशा पद्धतीने कामगिरी करतात, त्यावर भारताचे यश अवलंबून आहे. भारताकडे मुरली विजय, लोकेश राहुल आणि पृथ्वी शॉ हे तीन फलंदाज सलामीच्या स्थानासाठी शर्यतीत आहेत. पृथ्वी शॉ दुखापतीमुळे बाहेर झाला आहे आणि शिखर धवनला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे मुरली विजय – राहुल यांनाच सलामीला निवडणार कि काही दुसरा पर्याय शोधणार हे पाहणे महत्वाचे आहे.

भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजांचा सामना करायचा आहे. अशा वेळी मुरली विजय, अजिंक्य रहाणे हे उत्तम आणि अनुभवी खेळाडू आहेत. पण गेल्या काही मालिकांमध्ये भारताला सलामीच्या जोडीबाबत झुंजावे लागत आहे. याबाबत त्यांनी लवकर उपाय शोधायला हवा, असे बुचानन यांनी नमूद केले.