4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशा बरोबरीवर आलेल्या भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. फॉर्मात नसलेल्या फलंदाजीसोबत आता खेळाडूंच्या दुखापतीचं ग्रहणही संघाला लागलं आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, डावखुरा फिरकीपटू रविंद्र जाडेजाच्या खांद्याला दुखापत झालेली आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : भारताला अजुनही मालिका विजयाची संधी – सौरव गांगुली

भारतामध्ये रणजी सामना खेळत असतानाच जाडेजाच्या खांद्याला दुखापत झाल्याचं समजतंय. पर्थ कसोटीसाठी जाडेजाचा 13 जणांच्या संघात समावेशही करण्यात आला होता. परंतु दुखापतीमुळे त्याचा अंतिम 11 जणांच्या संघात विचार झाला नाही. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी जाडेजाने 4 इंजेक्शन घेतली होती, मात्र त्याची ही दुखापत अजुनही पूर्णपणे बरी झाली नसल्याचं रवी शास्त्री यांनी तिसऱ्या सामन्याआधी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. जाडेजाच्या दुखापतीने बरं होण्यास अपेक्षेपेक्षा अधिक कालावधी घेतल्याचंही शास्त्री यांनी मान्य केलं.

फिटनेस हा भारतीय संघासाठी सध्या मोठा मुद्दा असल्याचंही शास्त्री यांनी कबूल केलं. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी पुढील 48 तासांत आश्विनच्या दुखापतीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. रोहित शर्माने चांगलं पुनरागमन केलं आहे, त्यामुळे आगामी दोन दिवसांमध्ये तो किती फिट होतोय हे देखील बघितलं जाईल. मात्र संघात पुनरागमन केलेला हार्दिक पांड्या हा पूर्णपणे फिट आहे. परंतु हार्दिकला तिसऱ्या कसोटी सामन्यात अंतिम 11 जणांच्या संघात जागा मिळेल का या प्रश्नाचं उत्तर देणं शास्त्री यांनी टाळलं.

अवश्य वाचा – IND vs AUS : शशी थरुरांनी सोडवला भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीचा प्रश्न…