भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत १९ षटकात ७ बाद १३२ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतापुढे डकवर्थ लुईस नियमानुसार १९ षटकात १३७ धावांचे आव्हान देण्यात आले होते. पुन्हा पाऊस आल्याने त्या आव्हानात बदल करण्यात आला आणि ११ षटकात ९० धावांचे आव्हान देण्यात आले. पण पाऊस न थांबल्याने सामना रद्द करण्यात आला.

सामना रद्द झाल्याने ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी कायम ठेवली आहे. पण या दरम्यान भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याने मात्र या सामन्यात आपला बदला घेतला. पहिल्या सामन्यात कृणाल पांड्याला सलग तीन षटकार खेचणाऱ्या मॅक्सवेलला त्याने या सामन्यात त्रिफळाचीत केले. ग्लेन मॅक्सवेलने गेल्या सामन्यात २४ चेंडूत ४६ धावा ठोकल्या होत्या. त्यातही सर्वाधिक धावा कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवरच घेण्यात आल्या होत्या. पण आज तो स्वस्तात माघारी परतला. २२ चेंडूत १९ धावा करून तो बाद झाला. त्याने आजच्या डावात केवळ १ चौकार लगावला आणि कृणालने त्याला माघारी धाडले.

व्हिडीओ –

दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने दुसऱ्या सामन्यातही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच शून्यावर झेलबाद झाला. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने यष्ट्यांमागे त्याचा झेल टिपला आणि ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. फटकेबाजीला सुरुवात केल्यानंतर धोकादायक ख्रिस लिनदेखील १३ धावांवर झेलबाद झाला. पाठोपाठ चांगली सुरुवात मिळालेला सलामीवीर डार्सी शॉर्ट खलीलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने १४ धावा काढल्या. मॅक्सवेलच्या साथीने गेल्या सामन्यात चांगली फलंदाजी केलेला मार्कस स्टॉयनीस (४) बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलही आज स्वस्तात माघारी परतला. २२ चेंडूत १९ धावा करून तो बाद झाला. त्याने आजच्या डावात केवळ १ चौकार लगावला. देशांतर्गत टी२० स्पर्धेत चांगली कामगिरी करणारा यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरी (४) या सामन्यात अपयशी ठरला. नॅथन कुल्टर-नाईल याने ९ चेंडूत १८ धावा तडकावून बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाचा सातवा गडी माघारी परतला. त्याला भुवनेश्वर कुमारने माघारी पाठवले. बेन मॅकडरमॉटने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेऊन केलेल्या उपयुक्त खेळीच्या जोरावर भारतापुढे डकवर्थ लुईस नियमानुसार १९ षटकात १३७ धावांचे आव्हान देण्यात आले होते. त्यापुढे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही.