पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियावर निर्विवाद वर्चस्व गाजवलेल्या भारताला तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून चांगलीच झुंज मिळाली. सलामीवीर उस्मान ख्वाजाचं शतक आणि कर्णधार अरोन फिंचचं धडाकेबाज अर्धशतक या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५ गड्यांच्या मोबदल्यात ३१३ धावांपर्यंत मजल मारली. ख्वाजाने १०४ तर फिंचने ९३ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलनेही ४७ धावांची आक्रमक खेळी करत आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावली. भारताचे गोलंदाज आज सपशेल अपयशी ठरले. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर अंकुश लावण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी झाले.

कुलदीप यादवने ३ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या संघाला धक्के दिले. कुलदीपने कर्णधार फिंच, शॉन मार्श आणि पिटर हँडस्काँबला माघारी धाडलं. या कामगिरीसह कुलदीप यादवने ४२ वन-डे सामन्यानंतर सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे. कुलदीपच्या नावावर वन-डे क्रिकेटमध्ये ८५ बळी जमा आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कशी कुलदीपने बरोबरी साधली. यावेळी कुलदीपने न्यूझीलंडचा माजी गोलंदाज शेन बाँडलाही मागे टाकलं.

अवश्य वाचा – BCCI Annual Contract : ‘गब्बर’चं स्थान घसरलं, पंतला बढती

तिसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी ‘आर्मी कॅप्स’ घालून मैदानात उतरत सर्वांची मनं जिंकली. पहिल्या दोन सामन्यात बाजी मारुन भारताने ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. आगामी वन-डे विश्वचषकाआधी भारतीय संघाची ही अखेरची वन-डे मालिका असणार आहे. त्यामुळे या मालिकेत विजय प्राप्त करुन विश्वचषकात सकारात्मक वृत्तीने जाण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.

अवश्य वाचा – Video : मराठमोळ्या केदार जाधवने राखला ‘आर्मी कॅप’चा मान ! धोनीला केला कडक सॅल्युट