सलामीवीर रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात आपल्या वन-डे कारकिर्दीतलं 22 वं शतक झळकावलं. 133 धावांची खेळी करणाऱ्या रोहित शर्मा मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. 289 धावांचा पाठलाग करताना झाय रिचर्डसन आणि जेसन बेहरनडॉर्फ यांच्या माऱ्यासमोर भारतीय संघ कोलमडला. रोहित आणि धोनीने चौथ्या विकेटसाठी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाचा चांगली झुंज दिली. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने, धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी योग्य फलंदाज असल्याचं म्हटलं आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : सिडनी वन-डे सामन्यात नोंदवलेले हे ९ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?

“धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणं हे संघासाठी नेहमी फायद्याचं ठरेलं असं माझं वैय्यक्तिक मत आहे. मात्र अंबाती रायुडूनेही चौथ्या क्रमांकावर संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. यामध्ये कर्णधार आणि प्रशिक्षक काय विचार करतात ही बाब देखील तितकची महत्वाची आहे. पण माझ्या मताप्रमाणे धोनी, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी योग्य फलंदाज आहे.” रोहित सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होता.

अवश्य वाचा – Video : जेव्हा DRS ची संधी गमावणं भारताला महागात पडतं, धोनीला पंचांनी चुकीच्या पद्धतीने ठरवलं बाद

जर तुम्ही धोनीच्या फलंदाजीची आकडेवारी पाहिलीत तर अंदाजे 90 च्या सरासरीने तो धावा काढतो आहे. पहिल्या सामन्यात 3 फलंदाज झटपण माघारी परतल्यामुळे परिस्थिती वेगळी होती, त्यावेळी मैदानावर टिकून राहणं गरजेचं होतं. मैदानात आल्याआल्या तुम्ही शतकी भागीदारी उभारु शकत नाही. याला थोडा वेळ लागतो, पहिल्या काही मिनीटांमध्ये मी देखील संथच खेळत होतो. त्या क्षणी आमच्यापैकी एकही जण बाद झाला असता तर सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला असता. याचसाठी आम्ही संथ खेळ करत खेळपट्टीवर टिकून राहण्याकडे कल दिला. रोहितने धोनीच्या फलंदाजीचं समर्थन केलं. 15 जानेवारीला दोन्ही संघांमध्ये दुसरा सामना रंगणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : धोनीची विकेट मिळाली हे आमचं भाग्यच – रिचर्डसन