भारतानं ऑस्ट्रेलियावर अॅडलेडमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. तब्बल १० वर्षांनी मिळवलेल्या या विजयामुळे चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारताचं पारडं जड झालं खरं, परंतु उत्साहाच्या भरात भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना बोलण्याचं भान राहिलं नाही आणि ते कॅमेऱ्यासमोर जे बोलू नये ते बोलून बसले.

ऑस्ट्रेलियाच्या शेपटानं कडवट झुंज दिली आणि भारताचा विजय अवघड केला. हे सांगताना शास्त्रींनी गल्लीत बोलली जाणारी भाषा मुलाखत देताना वापरली, जी लिहिताही येणार नाही. सोशल मीडियावर शास्त्रींच्या भाषेची चांगलीत दखल घेतली गेली. तुम्हीच ऐका काय म्हणाले शास्त्री…

दरम्यान, विजयासाठी दिलेले ३२३ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या संघाला पेलले नाही. त्यांचा दुसरा डाव २९१ धावांत आटोपला. अष्टपैलू पॅट कमिन्स आणि कर्णधार टीम पेन यांनी खेळपट्टीवर संयमी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. भारताच्या वेगवान गोलंदाजीपुढे कांगारुंची झुंज अपयशी ठरली. या सामन्यात चेतेश्वर पुजाराने पहिल्या डावात १२३ तर दुसऱ्या डावात ७१ धावा केल्या. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.