भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ६ बाद २७७ धावा केल्या. सलामीवीर हॅरिस, फिंच आणि मधल्या फळीतील हेड या तिघांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ही मजल मारली. शॉन मार्शनेही ४५ धावांची खेळी केली. ४ वेगवान गोलंदाज घेऊन खेळणाऱ्या भारताला दिवसभरात सहा बळी टिपता आले. मात्र त्यापैकी २ गडी फिरकीपटू हनुमा विहारीने बाद करत आपली उपयुक्तता सिद्ध केली.

भारताने संघात ४ वेगवान गोलंदाज खेळवले. त्यामुळे फिरकीपटू म्हणून विराट कोहलीने हनुमा विहारीला गोलंदाजी दिली आणि कुठे टप्पा टाकावा हेदेखील सांगितले. त्यानुसार गोलंदाजी करत त्याने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या हॅरिसला ७० धावांवर बाद केले. पण त्यानंतर आलेल्या फलंदाजांनाही तो तशाच टप्प्यावर गोलंदाजी करत राहिला. त्यावेळी ऋषभ पंतने चक्क मैदानावर विराट कोहलीलाच सल्ला दिला.

‘तू सांगितल्याप्रमाणे त्याने टप्पा टाकून गोलंदाजी केली. त्यामुळे गडी देखील बाद झाला. आता त्याला थोडा टप्पा पुढे टाकायला सांग.’ असे त्याने सांगितले. त्यानंतर हनुमाने टप्पा बदलला आणि त्याला आणखी एक गडी बाद करता आला.

दरम्यान, आजच्या दिवसात दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फिंच आणि हॅरिस यांनी अतिशय सावध पवित्रा घेत डावाला सुरुवात केली. १५ व्या षटकात अर्धशतक गाठलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी त्यानंतर तर अधिक संथ खेळ केला. त्यामुळे उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २६ षटकात बिनबाद ६६ धावा इतकी झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या सत्रात ठेवलेली फलंदाजीची संथ लय कायम ठेवत चहापानापर्यंत ३ बाद १४५ अशी मजल मारली. पहिल्या सत्रात एकही बळी न गमावलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सत्रात ३ बळी गमावले. बुमराह, उमेश यादव आणि हनुमा विहारी यांनी १-१ बळी घेतले. शेवटच्या सत्रात मधल्या फळीतील फलंदाज पीटर हॅंड्सकॉम्ब ७ धावा करून बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला. विराट कोहलीने स्लिपमध्ये अफलातून झेल टिपत त्याला माघारी धाडले. इशांतने त्याचा काटा काढला. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या शॉन मार्शला ४५ धावांवर झेलबाद व्हावे लागले. विहारीने ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. मार्शने ९८ चेंडूत ही खेळी केली. त्यानंतर संयमी खेळी करणारा ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड अर्धशतक ठोकून बाद झाला. अर्धशतक झाल्यानंतर मोठा फटका मारताना तो ५८ धावांवर बाद झाला.