भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ असे पराभूत केले. या विजयामुळे भारताने प्रथमच ऑयस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली आणि इतिहास रचला. या मालिकेत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. पण सलामीवीर मुरली विजय, लोकेश राहुल हे दोघे त्यांच्या खेळीमुळे टीकेचे लक्ष्य ठरले. उमेश यादवलाही त्याच्या बोथट गोलंदाजीमुळे टीका ऐकावी लागली.

या मालिकेत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हेदेखील कधी आक्षेपार्ह शब्द वापरल्याबाबद्दल तर कधी बिअरची बाटली हातात घेऊन सेलिब्रेशन केल्याबद्दल ट्रोल झाले. याबाबत आणि टीम इंडियाबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की मी जेव्हा संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेतली तेव्हा संघ कसोटी क्रमवारीत पाचव्या-सहाव्या क्रमांकावर होता. मी आणि संघातील खेळाडूंनी केलेल्या मेहनतीच्या जोरावर टीम इंडियाने हे यश सम्पादन केले आहे. आणि हे यश पुढेही कायम राहील. पण काही लोकांना संघाला नावं ठेवण्यातच धन्यता वाटते. पण ज्यांना नावंच ठेवायची असतील, त्यांनी खुशाल तसं करावं. त्या गोष्टींचा काही फरक पडणार नाही, हे त्यांना नंतर कळेल, असे शास्त्री यांनी स्पष्टपणे सांगितले.

‘असे अनेक लोक आहेत, ज्यांना कायम संघाला नावं ठेवण्यातच समाधान मिळतं. ते कायम टीकेचा भडिमार करत राहतात, असेही ते टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. ‘सोशल मीडियावर तीव्र शब्दात टीका केली जाते, पण त्याचे मला फारसे नवल वाटत नाही. कारण ते व्यक्त होण्याचे माध्यम आहे. तेथे सर्व विचारांचे लोक असतात. त्यामुळे जोवर तुम्ही ती मतं वैयक्तिक स्तरावर ऐकत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या मतांचा स्वतःवर फारसा फरक पडत नाही. पण काही अशी लोकंदेखील आहेत, ज्यांना कायम या संघाबाबत वाईटच बोलायचं असतं. आणि त्यांच्या टीकेचा स्वरदेखील खूप टोकाचा असतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.