मेलबर्नच्या ऐतिहासीक मैदानावर भारताने ऑस्ट्रेलियावर 137 धावांनी मात करत मालिकेत पुन्हा एकदा आघाडी घेतली. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. मोठ्या कालखंडानंतर भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याची नामी संधी आली आहे. पर्थ कसोटीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघाने मेलबर्नच्या मैदानावर दमदार पुनरागमन केलं. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यावर आपलं पूर्णपणे वर्चस्व गाजवलं. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज तगच धरु शकले नाहीत. दरम्यान या कसोटी सामन्यात तब्बल 11 विक्रमांची नोंद करण्यात आली.

अवश्य वाचा – IND vs AUS : भारताच्या गोलंदाजी फळीचं राहुल द्रविडकडून कौतुक

1) परदेशात खेळत असताना विराट कोहलीने माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या सर्वाधिक कसोटी विजयांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. गांगुलीने परदेशात 28 कसोटी सामन्यांमध्ये 11 वेळा भारताला विजय मिळवून दिला आहे. धोनीने 30 कसोटी सामन्यांत 6 तर राहुल द्रविडने 17 कसोटी सामन्यांमध्ये 5 सामन्यात विजय मिळवून दिला आहे.

2) कसोटी क्रिकेटमध्ये 150 वा विजय मिळवणारा भारत पाचवा देश ठरला. याआधी ऑस्ट्रेलिया (384 विजय), इंग्लंड (364 विजय), वेस्ट इंडिज (171 विजय), दक्षिण आफ्रिका (162 विजय)

3) 2018 या कॅलेंडर वर्षात भारताने परदेशांत 4 कसोटी सामने जिंकले आहेत. (जोहान्सबर्ग, ट्रेंट ब्रिज, अॅडलेड, मेलबर्न) 1968 सालानंतर अशी कामगिरी करण्याची भारताची ही पहिलीच वेळ ठरली आहे. 1968 साली भारताने परदेशात 3 कसोटी सामने जिंकले होते. (सर्व सामने न्यूझीलंडमध्येच)

अवश्य वाचा – IND vs AUS : जरा विराटकडून शिका, ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांनी फलंदाजांना सुनावलं

4) 37 वर्ष आणि 10 महिन्यांनंतर भारताचा मेलबर्नच्या मैदानावरचा हा पहिलाच विजय ठरला आहे.

5) मेलबर्न कसोटीत भारताचा ऑस्ट्रेलियावरील विजय हा सर्वात चौथा मोठा विजय ठरला आहे. याआधीचे 3 मोठे विजय पुढीलप्रमाणे –

  • 1952 – एक डाव आणि 8 धावा
  • 1994 – एक डाव आणि 119 धावा
  • 2009 – एक डाव आणि 144 धावा
  • 2018 – 137 धावांनी विजय

6) 2018 सालात 14 कसोटी सामन्यात भारतीय जलदगती गोलंदाजांनी एकूण 179 विकेट घेतल्या आहेत. यंदाच्या वर्षात कोणत्याही आशियाई संघाला अशी कामगिरी करणं जमलेलं नाहीये.

7) 9 गडी बाद करत जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियात सर्वोत्तम कामगिरीचा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. याआधी भारतीय गोलंदाजांमध्ये कपिल देव आणि अजित आगरकर यांनी ऑस्ट्रेलियात 8 विकेट घेतल्या होत्या.

8) कसोटी पदार्पणाच्या वर्षात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानावर. 2018 सालात बुमराहने 48 बळी घेतले आहेत.

9) भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत इशांत शर्माने बिशनसिंह बेदी यांना मागे टाकलं आहे. इशांतच्या खात्यात 267 बळी जमा आहेत, तर बेदी यांच्या नावावर 266 बळींची नोंद आहे.

10) एका कसोटी मालिकेत यष्टींमागे सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आता ऋषभ पंतच्या नावावर जमा. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत आतापर्यंत पंतने यष्टींमागे 20 बळी घेतले आहेत.

11) कसोटी पदार्पणाच्या वर्षात यष्टींमागे सर्वाधिक बळी घेणाच्या ब्रॅड हॅडिनच्या विक्रमाशी पंतची बरोबरी. दोघांच्याही नावावर 42 बळींची नोंद आहे.