भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर इतिहास रचला. टी२० मालिका बरोबरीत सुटल्यानंतर भारताने कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. या दौऱ्याच्या शेवटच्या सामन्याआधी ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी होती. त्यानंतर भारताने तिसरा सामना ७ गडी राखून जिंकला. महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने २३० धावांचे आव्हान लीलया पेलले. पण या सामन्यात खरा ‘हिरो’ ठरला युझवेन्द्र चहल.

कुलदीप यादवच्या जागी संघात युझवेन्द्र चहलला संघात स्थान देण्यात आले. त्याने या संधीचे सोने केले. त्याने ४२ धावांत ६ बळी टिपले आणि ऑस्ट्रेलियाला डाव झटपट गुंडाळला. त्याच्या या कामगिरीवर सर्व स्तरातून स्तुती करण्यात आली. यात माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने ‘सेहवाग स्टाईल’ ट्विट करून चहलचे कौतुक केले. ‘चहलका मचा रखा है’, असे विशेष ट्विट त्याने पहिला डाव संपल्यानंतर केले. तसेच त्याला ६ बळी टिपल्याबद्दल शाबासकीदेखील दिली.

त्यावर चहलनेही त्याचे आभार मानले.

दरम्यान, चहलने ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम कामगिरी करत माजी क्रिकेटपटू अजित आगरकर याच्या विक्रमाशी बरोबरी केली. आगरकरने २००४ मध्ये मेलबर्नवरच ४२ धावांत ६ फलंदाज बाद केले होते. आज तीच कामगिरी चहलनेही केली.