पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियावर निर्विवाद वर्चस्व गाजवलेल्या भारताला तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून चांगलीच झुंज मिळाली. सलामीवीर उस्मान ख्वाजाचं शतक आणि कर्णधार अरोन फिंचचं धडाकेबाज अर्धशतक या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५ गड्यांच्या मोबदल्यात ३१३ धावांपर्यंत मजल मारली. ख्वाजाने १०४ तर फिंचने ९३ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलनेही ४७ धावांची आक्रमक खेळी करत आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावली. भारताचे गोलंदाज आज सपशेल अपयशी ठरले. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर अंकुश लावण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी झाले.

अवश्य वाचा – Video : मराठमोळ्या केदार जाधवने राखला ‘आर्मी कॅप’चा मान ! धोनीला केला कडक सॅल्युट

प्रत्युत्तरादाखल मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात मात्र खराब झाली. सलामीवीर शिखर धवन, रोहित शर्मा आणि अंबाती रायुडू हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाने आघाडी घेतल्यानंतर, भारतीय संघ बॅकफूटवर गेला. भारताचा तिसरा फलंदाज माघारी परतल्यानंतर ‘लोकल बॉय’ धोनीने रांचीच्या मैदानावर पाऊल ठेवलं, आणि संपूर्ण मैदानात एकच जल्लोष झाला. घरच्या मैदानावर धोनीचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो, त्यामुळे धोनीला पाहण्यासाठी स्थानिक चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बीसीसीआयने या घटनेचा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

पहिल्या दोन सामन्यात बाजी मारुन भारताने ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. आगामी वन-डे विश्वचषकाआधी भारतीय संघाची ही अखेरची वन-डे मालिका असणार आहे. त्यामुळे या मालिकेत विजय प्राप्त करुन विश्वचषकात सकारात्मक वृत्तीने जाण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.

अवश्य वाचा – Women’s Day 2019 : आईसाठी सचिनची मास्टर रेसिपी ! बनवलं वांग्याचं भरीत