ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात, पहिल्या सत्राच्या खेळात भारतीय फलंदाजीची अक्षरशः दाणादाण उडाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा विराट कोहलीचा निर्णय त्याच्या फलंदाजांनी पुरता चुकीचा ठरवला. सलामीवीर लोकेश राहुल, मुरली विजय हे ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीकडून भारताला खूप आशा होत्या. गेल्या वर्षभरात विराट कोहली फलंदाजीत चांगल्या फॉर्मात आहे. मात्र आजच्या सामन्यात तो ही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नाही.

ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर विराट अवघ्या ३ धावसंख्येवर झेलबाद झाला. गलीमध्ये उभ्या असलेल्या उस्मान ख्वाजाने यावेळी विराटचा एकहाती झेल पकडून भारताला मोठा धक्का दिला. ख्वाजाचा हा झेल पाहून विराटही काही क्षणांसाठी अवाक झाला.