कुलदीप यादवच्या जागी संघात स्थान मिळालेल्या युझवेंद्र चहलने तिसऱ्या वन-डे सामन्यात सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. चहलने ऑस्ट्रेलियाच्या 6 फलंदाजांना माघारी धाडलं. त्याच्या याच कामगिरीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला 230 धावांमध्ये रोखलं. या खेळीदरम्यान चहलने आपले प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा विक्रमही मोडीत काढला आहे. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणाऱ्या फिरकीपटूंच्या यादीत चहलने रवी शास्त्रींना मागे टाकलं आहे.

1991 साली शास्त्री यांनी ‘वाका’च्या खेळपट्टीवर 5 बळी घेतले होते, चहलने आज 6 बळी घेत शास्त्री गुरुजींना मागे टाकलं. चहलने एका षटकात उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श ही जमलेली जोडी फोडली. त्याने एकाच षटकात दोघांनाही माघारी पाठवले. त्यानंतर त्याने पीटर हँड्सकॉम्ब, मार्कस स्टॉयनिस, झाय रिचर्डसन आणि झॅम्पा यांना बाद केले. या कामगिरीसह त्याने आगरकरच्या विक्रमाची बरोबरी केली. आगरकरने 2004 मध्ये मेलबर्नवरच 42 धावांत 6 फलंदाज बाद केले होते आणि चहलने 2019 मध्ये 42 धावांत 6 विकेट घेतल्या.