कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावलं आहे. दिवस-रात्र कसोटी सामन्यात शतक झळकावणारा विराट कोहली भारताचा पहिला कर्णधार आणि खेळाडू ठरला आहे. विराटने १९४ चेंडूत १८ चौकारांसह १३६ धावा केल्या. या खेळीदरम्यान विराटने दिवस-रात्र कसोटीच्या इतिहासात एका विक्रमाशी बरोबरी केली आहे.

अवश्य वाचा – IND vs BAN : ऐतिहासिक शतकासह विराटची सचिनच्या कामगिरीशी बरोबरी

इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार जो रुटच्या दिवस-रात्र कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाशी विराटने बरोबरी केली आहे. जो रुटने २०१७ साली दिवस-रात्र कसोटीत १३६ धावा केल्या होत्या, विराटने आज या विक्रमाशी बरोबरी केली आहे. विराटने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथचा १३० धावांचा विक्रम मोडला.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराट कोहलीचं हे ४१ वं शतक ठरलं. या कामगिरीसह विराट कोहलीने माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींगशी बरोबरी केली आहे. पहिल्या दिवशी चेतेश्वर पुजाराने अर्धशतक झळकावल्यानंतर, उप-कर्णधार अजिंक्य रहाणेनेही अर्धशतकी खेळी करत विराटला साथ दिली. अजिंक्यने ६९ चेंडूत अजिंक्यची ७ चौकारांसह ५१ धावांची खेळी केली.