बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १३० धावांनी विजय मिळवला. मोहम्मद शमीचे चार बळी आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली साथ याच्या बळावर भारताला दणदणीत विजय मिळवणे शक्य झाले. मयांक अग्रवाल याने केलेल्या द्विशतकामुळे भारताला पहिल्या डावात मोठी आघाडी घेता आली. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव मात्र अवघ्या २१३ धावांवर आटोपला. द्विशतक ठोकणाऱ्या मयांक अग्रवालला सामनावीर जाहीर करण्यात आले.

सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताने डाव घोषित केल्यानंतर तिसऱ्या दिवशी बांगलादेशच्या संघाचा दुसरा डाव सुरू झाला. ३४३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशची दुसऱ्या डावातही सुरूवात खराब झाली. उपहारापर्यंतच त्यांनी ६० धावांत बांगलादेशने ४ गडी गमावले. त्यानंतरही बांगलादेशला सावरता आले नाही. शदमन इस्लाम, इमरूल कयास, कर्णधार मोमिनुल हक, मोहम्मद मिथून, मोहम्मदुल्लाह, ताजीउल ईस्लाम आणि एबादत हुसेन या साऱ्यांनी निराशा केली. मुश्फिकूर रहीम (४३), मेहिदी हसन (३८) आणि लिटन दास (३५) यांनी काही काळ संघर्ष केला. पण ते संघाचा पराभव टाळू शकले नाही. शमीने ४, अश्विनने ३, उमेशने २ तर इशांतने १ गडी बाद केला.

त्याआधी, भारताच्या डावात सलामीवीर मयांक अग्रवालने द्विशतक (२४३) ठोकले. चेतेश्वर पुजारा (५४), अजिंक्य रहाणे (८६) आणि रविंद्र जाडेजा (६०) यांनी त्याला चांगली साथ दिली. त्यामुळे भारताला ४९३ धावांवपर्यंत मजल मारता आली. बांगलादेशकडून अबू जायेदने ४ तर मेहिदी हसन मिराज आणि एबादत यांनी १-१ गडी बाद केला.

त्याआधी, बांगलादेशच्या पहिल्या डावात शदमन इस्लाम, इमरूल कयास आणि मोहम्मद मिथून हे तिघेही स्वस्तात बाद झाले. कर्णधार मोमिनुल हक आणि अनुभवी मुश्फिकूर रहीम या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदीरी केली. अखेर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने ही जोडी फोडली. मोमिनुलने चेंडू न खेळण्याचा निर्णय घेतला पण चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला. त्यामुळे ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा करून मोमिनुल बाद झाला. मोमिनुलने ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा केल्या. त्यानंतर अनुभवी मुश्फिकूर रहीम शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने १०५ चेंडूत ४३ धावा केल्या, पण बाकी फलंदाजांना खेळपट्टीवर दीर्घ काळ तग धरता आलं नाही. लिटन दासने २१ धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही बांगलादेशचा डाव १५० धावांत आटोपला.