भारतीय संघाने कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात बाजी मारली. टी २० मालिकेत २-१ असा विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने २-० असे निर्विवाद वर्चस्व राखत ICC च्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. भारताने बांगलादेशवर १ डाव आणि ४६ धावांनी मात केली. पहिला डाव ३४७ धावांवर घोषित केल्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव भारताने १९५ धावांवर संपला.

दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी कमाल करून दाखवली. उमेश यादवने बांगलादेशचा निम्मा संघ गारद केला, तर त्याला इशांत शर्माने ४ बळी घेत चांगली साथ दिली. बांगलादेशचा एक फलंदाज जखमी झाल्यामुळे खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत ९ गडी बाद करत भारताने ऐतिहासिक विजय साकारला.

अशी झाली बांगलादेशी वाघांची शिकार –

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने बांगलादेशच्या सहा फलंदाजांना माघारी धाडलं होतं. सलामीवीर शदमन इस्लाम (०) आणि इमरूल कयास (५) दोघे स्वस्तात बाद झाले. कर्णधार मोमिनुल हक शून्यावर माघारी परतला. मोहम्मद मिथून देखील पाठोपाठ ६ धावांवर माघारी परतला. मोहम्मदुल्लाह रिटायर्ड हर्ट झाला. त्याने ७ चौकारांसह ३९ धावा केल्या होत्या. नंतर मेहिदी हसन मिराजदेखील (१५) बाद झाला. मुश्फिकूर रहीमने याने मात्र एक बाजू लावून धरली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळ सुरू झाल्यावर तैजूल इस्लाम आणि एबादत हुसेन हे दोघे झटपट बाद झाले आहेत. मुश्फिकूर रहीमने अर्धशतक ठोकले, पण तो ७४ धावांवर बाद झाला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याने १३ चौकार लगावले. अल-अमीन हुसेन याने ५ चौकार खेचत काही काळ मनोरंजन केले, पण अखेर तो झेलबाद झाला.