भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टी २० सामन्यात भारताने ८ गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या टी २० सामन्यावर ‘महा’ वादळाचे सावट होते. मात्र त्या वादळाचा कोणताही अडथळा न येता सामना सुरळीत पार पडला. उलट पहिल्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या बांगलादेशच्या संघाला या सामन्यात हिटमॅन वादळाचा तडाखा बसला. रोहितच्या ८५ धावांच्या खेळीच्या बळावर भारताने सामना जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. दुसऱ्या सामन्यात १३ व्या षटकात सौम्या सरकार बाद झाला. युझवेंद्र चहलच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर सौम्या सरकार पुढे येऊन मोठा फटका खेळणार होता. पण त्याला चेंडू कोणत्या बाजूने वळेल त्याचा अंदाज येऊ शकला नाही. तो खेळण्यासाठी पुढे आला, तेव्हा त्याला पंतने यष्टिचीत केले. मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांनी मदत घेतली. त्यावेळी फलंदाज बाद असूनही मोठ्या स्क्रीनवर आधी तिसऱ्या पंचांनी आधी फलंदाजाला नाबाद ठरवले. पण त्यानंतर मात्र चूक सुधारून फलंदाज बाद असल्याचे सांगण्यात आले. असा झाला सौम्या सरकार बाद - चुकीच्या निर्णयावर रोहितची उद्विग्न प्रतिक्रिया - Rohit pic.twitter.com/CDKGcJESzJ — Ghatta (@Kattehaiklu) November 7, 2019 दरम्यान, सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. लिटन दास (२९), मोहम्मद नईम (३६), सौम्या सरकार (३०) आणि मोहम्मदुल्लाह (३०) यांच्या छोटेखानी खेळींच्या सांघिक कामगिरीच्या बळावर बांगलादेशने २० षटकात ६ बाद १५३ धावांपर्यंत मजल मारली आणि भारतापुढे १५४ धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून चहलने सर्वाधिक २ बळी टिपले. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली. ११८ धावांच्या भागीदारीनंतर शिखर धवन पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या नादात त्रिफळाचीत झाला. धवनने २७ चेंडूत ४ चौकार लगावत ३१ धावा केल्या. रोहितने मात्र फटकेबाजी सुरूच ठेवली. शतकाच्या नजीक पोहोचताना तो ८५ धावांवर माघारी परतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार लगावत केवळ ४३ चेंडूत ८५ धावा कुटल्या. अखेर श्रेयस अय्यरने धडाकेबाज खेळी करत १३ चेंडूत नाबाद २४ धावा केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला.