बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या मयंक अग्रवालने दमदार शतक ठोकले. बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर आटोपल्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या मयंकने शतकी खेळी केली. या खेळीसह त्याने सलामीवीर म्हणून आपले  तिसरे कसोटी शतक झळकावले. मयंकने या शतकाच्या साथीने दिग्गज क्रिकेटपटू विजय मर्चंट यांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

भारताकडून सर्वात कमी डावात सलामीवीर म्हणून ३ कसोटी शतके ठोकणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा अव्वल आहे. रोहितने ४ डावात ३ शतके ठोकली आहेत. त्याच्या पाठोपाठ सुनील गावस्कर यांनी ७ तर लोकेश राहुलने ९ डावांत तीन कसोटी शतके ठोकली होती. त्यानंतर १२ डावात विजय मर्चंट यांनी तीन कसोटी शतकांचा टप्पा गाठला होता. त्यांच्या विक्रमाशी मयंक अग्रवालने बरोबरी केली.

१ बाद ८६ या धावसंख्येवरून आज भारताने डावाला सुरूवात केली. मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा दोघांनी आपली अर्धशतके पूर्ण केली. पण त्यानंतर पुजारा ५४ धावांवर बाद झाला. पाठोपाठ विराटही शून्यावर माघारी परतला. पण रहाणेच्या साथीने अग्रवालने डाव सावरला. त्याआधी पहिल्या दिवशी भारताच्या डावात सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. चेतेश्वर पुजारा आणि मयंक अग्रवाल या दोघांनी दमदार खेळी केली. या दोघांनी ९१ धावांची भागीदारी केली.

तत्पूर्वी बांगलादेशच्या पहिल्या डावात शदमन इस्लाम, इमरूल कयास आणि मोहम्मद मिथून हे तिघेही स्वस्तात बाद झाले. पण दुसऱ्या सत्रात बांगलादेशकडून चांगली झुंज पहायला मिळाली. कर्णधार मोमिनुल हक आणि अनुभवी मुश्फिकूर रहीम या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदीरी केली. अखेर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने ही जोडी फोडली. मोमिनुलने चेंडू न खेळण्याचा निर्णय घेतला पण चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला. त्यामुळे ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा करून मोमिनुल बाद झाला. मोमिनुलने ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा केल्या. त्यानंतर अनुभवी मुश्फिकूर रहीम शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने १०५ चेंडूत ४३ धावा केल्या, पण बाकी फलंदाजांना खेळपट्टीवर दीर्घ काळ तग धरता आलं नाही. लिटन दासने २१ धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही बांगलादेशचा डाव १५० धावांत आटोपला.