भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर आटोपला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत भारताने ३ बाद ३०३ धावांपर्यंत मजल मारली. १ बाद ८६ या धावसंख्येवरून आज भारताने डावाला सुरूवात केली. मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा दोघांनी भारताच्या डावाला आकार दिला. त्यानंतर पुजारा ५४ धावांवर बाद झाला. पाठोपाठ विराटही शून्यावर माघारी परतला. अजिंक्य रहाणेनेही ८६ धावांची खेळी केली. मयंकने मात्र दमदार खेळी करत दुसरे द्विशतक ठोकले. सामन्यात १४६ धावांवर खेळत असताना मयंकने एक दमदार चौकार लगावला. मेहिदी हसन मिराजने टाकलेला चेंडू मयंकने दिमाखदारपणे टोलवला. त्या चौकारसह त्याने १५० धावांचा टप्पा गाठला. त्यानंतर मयंकने ड्रेसिंग रूमकडे पाहिले. तेव्हा विराटने त्याला २०० धावा करण्यासाठी ड्रेसिंग रूममधून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मयंकने कोहलीला थंप्स-अप दाखवलं आणि दमदार द्विशतक ठोकले. KOHLI: Go for 2⃣0⃣0⃣ AGARWAL: Aye Aye, Captain! - #LIVE pic.twitter.com/1lQo8u8KVi — Hotstar UK (@hotstarUK) November 15, 2019 दरम्यान, पहिल्या दिवशी भारताच्या डावात सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. चेतेश्वर पुजारा आणि मयंक अग्रवाल या दोघांनी दमदार खेळी केली. या दोघांनी ९१ धावांची भागीदारी केली. त्याआधी, बांगलादेशच्या पहिल्या डावात शदमन इस्लाम, इमरूल कयास आणि मोहम्मद मिथून हे तिघेही स्वस्तात बाद झाले. पण दुसऱ्या सत्रात बांगलादेशकडून चांगली झुंज पहायला मिळाली. कर्णधार मोमिनुल हक आणि अनुभवी मुश्फिकूर रहीम या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदीरी केली. अखेर फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने ही जोडी फोडली. मोमिनुलने चेंडू न खेळण्याचा निर्णय घेतला पण चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला. त्यामुळे ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा करून मोमिनुल बाद झाला. मोमिनुलने ८ चौकारांसह ८० चेंडूत ३७ धावा केल्या. त्यानंतर अनुभवी मुश्फिकूर रहीम शमीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने १०५ चेंडूत ४३ धावा केल्या, पण बाकी फलंदाजांना खेळपट्टीवर दीर्घ काळ तग धरता आलं नाही. लिटन दासने २१ धावा करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही बांगलादेशचा डाव १५० धावांत आटोपला.