विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. २२ नोव्हेंबरला कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानात हा सामना रंगणार आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या १-० ने आघाडीवर आहे. भारतीय संघासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या या सामन्यासाठी कोलकाता शहर सज्ज झालेलं आहे. इडन गार्डन्स परिसर आणि शहरातील महत्वाच्या वास्तूंना य़ा निमीत्ताने खास गुलाबी रंगात सजवण्यात आलेलं आहे.

भारतीय संघ पहिल्यांदाच गुलाबी चेंडूवर सामना खेळणार असल्यामुळे, खेळाडू कसून तयारी करत आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही या सामन्यासाठी विशेष पुढाकार घेतला होता. याआधी दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास बीसीसीआयचा विरोध होता, मात्र गांगुलीच्या पुढाकारामुळे बीसीसीआयने आपल्या भूमिकेत बदल केला आहे.