इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाने ६ बाद ३०० धावांपर्यंत मजल मारली. गेल्या काही सामन्यात सातत्याने टीकेचे लक्ष ठरणाऱ्या सलामीवीर रोहित शर्माने धडाकेबाज दीडशतक ठोकलं. शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे वरच्या फळीतील फलंदाज स्वस्तात बाद झाले. पण रोहितला उपकर्णधार अजिंक्य रहाणेने साथ दिल्यामुळे भारताला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करता आली. लीच आणि अली दोघांनी २-२ बळी टिपले.

IND vs ENG: रोहित शर्माचा पराक्रम; ख्रिस गेलच्या विक्रमाशी केली बरोबरी

कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्ण घेतला. शुबमन गिल शून्यावर बाद झाला. रोहित शर्माने चेतेश्वर पुजाराच्या साथीने डाव पुढे नेला. पण पुजारा २१ धावांवर माघारी परतला. पाठोपाठ विराट कोहलीदेखील शून्यावर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर दोन मुंबईकरांनी भारताच्या डावाला आकार दिला. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी १५२ धावांची भागीदारी केली. यांच्या भागीदारी दरम्यान रोहितने चेन्नईच्या मैदानावर आपलं पहिलं शतक ठोकलं.

IND vs ENG: मुंबईचा रोहित जगात भारी! ‘असा’ विक्रम करणारा पहिलाच क्रिकेटपटू

दीडशतकी खेळी केल्यानंतर २३१ चेंडूत १६१ धावा काढून रोहित बाद झाला. त्याने १८ चौकार आणि दोन षटकार लगावले. फिरकीपटू जॅक लीचच्या गोलंदाजीवर स्वीप शॉट खेळून रोहित बाद झाला. रोहित माघारी परतल्यानंतर भारताने झटपट गडी गमावले. आधी अजिंक्य रहाणे अर्धशतकी खेळी करून त्रिफळाचीत झाला. त्याने ९ चौकारांसह १४९ चेंडूत ६७ धावा केल्या. रविचंद्रन अश्विनदेखील १३ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऋषभ पंत (३३*) आणि अक्षर पटेल (५*) यांनी खेळपट्टीवर सांभाळली आणि संघाला तीनशेचा आकडा गाठून दिला.