पहिल्या कसोटी पाठोपाठ भारतीय संघाला लॉर्ड्सच्या मैदानावरही पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय संघ चारीमुंड्या चीत झाला. इंग्लंडने भारतावर १ डाव आणि १५९ धावांनी मात करत ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. भारताला पहिल्या डावात १०७ तर दुसऱ्या डावात १३० धावा करता आल्या. जेम्स अँडरसन-स्टुअर्ट ब्रॉड-ख्रिस वोक्स वेगवान गोलंदाजच्या त्रिकुटाने भारतीय गोलंदाजांना पळता भुई थोडी केली. या नंतर दिलेल्या एका मुलाखतीत हार्दिक पांड्या याने संघातील आपली भूमिका स्पष्ट केली.

दुसऱ्या डावात अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि रविचंद्रन अश्विन यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. त्याच्या बळावर भारताला किमान शंभरी गाठता आली. अन्यथा इतर फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर तग धरु शकले नाहीत. दोन्ही डावांमध्ये भारतीय सलामीवीरांनी निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या सामन्यात झुंजार खेळी करणारा कर्णधार विराटदेखील या सामन्यात ‘फ्लॉप’ ठरला. पण हार्दिक पांड्याने काही प्रमाणात आपली छाप पाडली. पहिल्या सामन्यात देखील हार्दिक शेवटपर्यंत मैदानावर तग धरून होता. मात्र त्याला गोलंदाजीत म्हणावा तसा प्रभाव पाडता आला नाही.

याबाबत हार्दिकने आपले मत व्यक्त केले. ‘मी जेव्हा गोलंदाजी करत असतो तेव्हा मी गोलंदाज असतो आणि ज्यावेळी मी फलंदाजीसाठी मैदानात उतरतो, तेव्हा मी फलंदाज असतो. हीच माझी संघातील भूमिका आहे. गोलंदाजी करताना मी एकाच टप्प्यावर आणि रेषेत गोलंदाजी कशी करता येईल याकडे लक्ष देतो. स्वतःच्या गोलंदाजीत फार प्रयोग न करता फलंदाजाला चूक करण्यास भाग पाडणे मला अधिक महत्वाचे वाटते. कारण फटके मारणे फलंदाजांना नेहमीच आवडते आणि त्यातच ते चुका करण्याची अधिक शक्यता असते’, असे तो म्हणाला.

इंग्लंडच्या फलंदाजी दरम्यान पहिले पाच बळी आम्ही झटपट टिपले. पण त्यानंतर चेंडू स्विंग होणे बंद झाले. त्यामुळे बेअरस्टो आणि स्टोक्स दोघांनी भागीदारी करत सामना भारतापासून दूर नेला. त्यांनतर सामन्यात पुनरागमन करणे भारताला शक्य झाले नाही. पण खेळ म्हंटले कि असे व्हायचेच, असेही पांड्याने नमूद केले.