टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अहमदाबादमध्ये होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या व अखेरच्या कसोटीत खेळणार नाहीये. बुमराहने वैयक्तिक कारणांमुळे बीसीसीआयकडे सुट्टी मागितली होती, ती स्वीकारण्यात आली आणि नंतर त्याला मालिकेतून माघार घेण्याची परवानगी देण्यात आली होती. पण, आता जसप्रीत बुमराह लग्न करणार असल्याची माहिती समोर आली असून त्यासाठीच त्याने मालिकेतून माघार घेतल्याचं समजतंय.

जसप्रीत बुमराहने लग्नाच्या तयारीसाठी सुट्टी घेतली असल्याचं वृत्त बीसीसीआयमधील सुत्रांच्या आधारे वृत्तसंस्था एएनआयने दिलंय आहे. बुमराह लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचंही सुत्रांनी सांगितलं. “लग्न करणार आहे आणि लग्नाच्या तयारीसाठी सुट्टी हवीये” असं बुमराहने बीसीसीआयला कळवलं होतं अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका संपल्यावर होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठीही बुमराहला आराम देण्यात आला आहे. दरम्यान, 27 वर्षांचा बुमराह इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत दोन सामने खेळला, यात त्याने चार विकेट घेतल्या. दुसऱ्या कसोटीसाठी त्याला आराम देण्यात आला होता, त्याच्याजागी मोहम्मद सिराजला संघात संधी मिळाली होती. दोन्ही संघातील अखेरचा कसोटी सामना 4 मार्च अर्थात उद्यापासून सुरू होणार आहे. हा सामना जिंकल्यास टीम इंडिया ही मालिका 3-1 अशा फरकाने खिशात घालेल.

चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के एल राहुल, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, उमेश यादव.